गुहागर – ग्राहक चळवळ ही सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवा म्हणजेच ग्राहकाचे विविध बाबींमध्ये होणारी फसवणूक टाळता येईल, असे प्रतिपादन अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे जिल्हाध्यक्ष श्री. चंद्रकांत मांडवकर यांनी केले.
ते संगमेश्वर येथील प. पू. गोळवलकर गुरुजी स्म्रुती प्रतिष्ठान गोळवली येथे झालेल्या जिल्हा व कोकण प्रांत सभेमध्ये बोलत होते.यावेळी स्वामी विवेकानंद यांची प्रतिमा पूजन करून संघटन मंत्राने सभेला सुरुवात झाली. महिला जागरण या विषयावर प्रांत सदस्या प्रणिता धामणस्कर यांनी महिला जागरण कार्यक्रमाबाबत मार्गदर्शन केले. महिलांनी ग्राहक जनजागृतीसाठी स्वतः च्या घरापासूनच सुरुवात केली पाहिजे. घरात आणण्यात येणाऱ्या वस्तू, आपल्या मुलांमध्ये त्याची जागृती मग त्यानंतर आपली वाडी, वस्ती, तालुकाभर हे काम केले पाहिजे. खास मुलांसाठी जागो ग्राहक जागो हा कार्यक्रम घेतला पाहिजे. रोज दुकानातील खरेदी, कॉलेज एडमिशन, व्यावसायिक अभ्यासक्रम व नोकरी या सर्व ठिकाणी ग्राहक म्हणून सजक असले पाहिजे. प्रत्येक वाडीतील महिला तालुका शाखेशी जोडा. ३० नोव्हेंबर पर्यंत महिलांचे गट तयार करून त्यांच्याकडून समस्या जाणून घ्या, असे त्यांनी सांगितले. प्रांत कोषाध्यक्ष सौ. वेदा प्रभुदेसाई यांनी आर्थिक व्यवहार पारदर्शक कसे ठेवायचे, सदस्यता वाढ करणे, वार्षिक अन्नदाता या विषयावर मार्गदर्शन केले. राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य विजय भागवत विविध आयाम सांगून युवकांनी उद्योजक बनावे व देशाच्या विकासात मोलाचा वाटा उचलावा असे सांगितले. देशातील असलेली बेरोजगारी दूर करण्यासाठी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने नवोदित उद्योजकांसाठी मार्गदर्शन सत्र ठेवले आहे. त्याचा जिल्ह्यातील उद्योजकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन केले.राष्ट्रीय सहसचिव नेहा जोशी यांनी प्रांत तालुका अधिक सक्षम करण्यासाठी विविध उपक्रमांद्वारे जाणीव जागृती निर्माण करावी असे सांगितले. कोकण प्रांत अध्यक्ष चंद्रकांत झगडे यांनी सदस्यता वाढ, ग्राहकांचे प्रश्न, तक्रारी, यावर मार्गदर्शन केले. तसेच गावात ग्राम मंडळे स्थापन करणे, गाव तिथे ग्राहक पंचायत अशी संकल्पना यावेळी मांडली. यावेळी सर्व तालुका अध्यक्ष यांनी केलेल्या कामांचा, उपक्रमांचा व सदस्य नोंदणी अहवालाचे वाचन केले.यावेळी कोकण प्रांत प्रचार प्रमुख चाळके, खेड तालुकाध्यक्ष लक्ष्मण आखाडे, संगमेश्वर तालुका अध्यक्ष दीपक पोंक्षे, गुहागर तालुका अध्यक्ष गणेश धनावडे, चिपळूण तालुका उपाध्यक्ष जगदीश वाघुळदे, विनायक ओक, अनंत पाध्ये, अजित शिंदे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते. प्रकाश सावर्डेकर यांनी सूत्रसंचालन केले. तर लक्ष्मण आखाडे यांनी उपस्थितांचे आभार मानले. शेवटी पसायदानाने सभेचा समारोप झाला.