चिपळूण – सह्याद्रीच्या दऱ्या-खोऱ्यांवर अभियांत्रिकीचा अद्भुत ठसा उमटवत खेड आणि महाबळेश्वर यांना जोडणारा भव्य केबल स्टेड स्काय ब्रिज आता पूर्णत्वास आला आहे. पावसाळ्यानंतर हा पूल वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता असून कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील दळणवळणाला नवी दिशा मिळणार आहे.
मुंबईच्या वरळी सी-लिंकची आठवण करून देणारा हा ५४० मीटर लांबीचा आणि १४ मीटर रुंदीचा स्काय ब्रिज सुमारे १७५ कोटी रुपयांच्या खर्चातून साकारण्यात आला आहे. सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये उभा ठाकलेला हा पूल केवळ वाहतुकीचे साधन नसून पर्यटनाचे नवे आकर्षण ठरणार आहे. या पुलामुळे खेड ते महाबळेश्वर प्रवासातील तब्बल ५० किलोमीटरचा फेरा कमी होणार आहे. पोलादपूर–आंबेनळी घाटाचा लांबचा मार्ग टळल्याने प्रवाशांचा वेळ, इंधन आणि खर्च या तिन्हींची मोठी बचत होणार आहे.
तापोळा परिसरातून कोकणातील गाढवली-आहिर भागाला जोडणारा हा पूल कोयना बॅकवॉटर परिसराला विकासाची नवी वाट दाखवणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच या प्रकल्पाची पाहणी करून काम अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितले.
४३ मीटर उंचीवरून पाहता येणार सह्याद्रीचे विहंगम सौंदर्य
या पुलाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मध्यभागी उभारलेली तब्बल ४३ मीटर उंच व्ह्यू गॅलरी. आधुनिक कॅप्सूल लिफ्ट आणि जिन्यांच्या सहाय्याने पर्यटकांना येथे पोहोचता येणार आहे. येथून कोयना बॅकवॉटर, सह्याद्रीच्या पर्वतरांगा, धुक्यात हरवलेली दरी आणि मनमोहक सूर्योदय-सूर्यास्त यांचे अद्भुत दर्शन घेता येणार आहे.
या नव्या पुलामुळे कांदाटी खोऱ्यातील शिंदी, वळवण, उचाट, आकल्पे, दरे यांसह २१ दुर्गम गावांचा वर्षभर संपर्क कायम राहणार आहे. पावसाळ्यात तुटणारा संपर्क आणि बार्जद्वारे करावा लागणारा धोकादायक प्रवास आता इतिहासजमा होणार आहे. रघुवीर घाट परिसराचे निसर्गसौंदर्य, दुर्मीळ लाल खेकड्यांचे दर्शन आणि कोयना बॅकवॉटरचे आकर्षण यामुळे या भागात पर्यटकांची संख्या वाढण्याची अपेक्षा आहे. परिणामी स्थानिक युवकांसाठी पर्यटन, हॉटेल व्यवसाय आणि वाहतूक क्षेत्रात रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होणार आहेत. सह्याद्रीच्या कुशीत उभा राहिलेला हा स्काय ब्रिज केवळ दोन जिल्ह्यांना जोडणारा पूल नाही, तर कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाला गती देणारा ‘आकाशाचा दुवा’ ठरणार आहे.
















