गुहागर – गुहागर तालुक्यातील दाभोळ वीज प्रकल्प पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. ग्रामपंचायतींचा अनेक वर्षांपासूनचा थकीत घरपट्टी व मालमत्ता कर न भरल्यामुळे रत्नागिरी गॅस अँड पॉवर प्रा. लि. (RGPPL) कंपनीविरोधात आता थेट जप्तीच्या कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. अंजनवेल, वेलदूर आणि रानवी या तीन ग्रामपंचायतींनी संयुक्तपणे कंपनीला अंतिम नोटीस बजावत कठोर भूमिका घेतली आहे.
ग्रामपंचायतींच्या म्हणण्यानुसार, २०१९ पासून कंपनीने मालमत्ता कराचा एक रुपयाही भरलेला नाही. वारंवार पाठपुरावा करूनही प्रतिसाद न मिळाल्याने ग्रामपंचायतींनी आता कायदेशीर कारवाईचा मार्ग स्वीकारला आहे. थकीत कराची रक्कम चार कोटी रुपयांहून अधिक असल्याचा दावा करण्यात आला आहे.
सरपंच सोनल मोरे यांनी सांगितले की, ग्रामपंचायतींच्या उत्पन्नाचा मोठा स्रोत असलेला हा कर न मिळाल्यामुळे तीनही गावांतील रस्ते, पाणीपुरवठा, दिवाबत्ती आणि इतर विकासकामांवर गंभीर परिणाम झाला आहे. त्यामुळे ग्रामपंचायत अधिनियमातील तरतुदीनुसार कंपनीची मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून जिल्हा प्रशासन आणि पोलिस प्रशासनालाही याबाबत नोटीस पाठविण्यात आली आहे. दरम्यान, २८ जुलै पूर्वी कंपनीने थकीत कर भरला नाही, तर प्रत्यक्ष जप्तीची कारवाई करण्यात येणार असल्याचे ग्रामपंचायतींनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता कंपनीची पुढील भूमिका काय असणार, याकडे संपूर्ण रत्नागिरी जिल्हा संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
















