गुहागर -गुहागर शहरातील नागरिकांसाठी लाखो रुपयांचा खर्च करून उभारण्यात आलेली अत्याधुनिक वैकुंठभूमी आजही वापराविना पडून आहे. कारण केवळ अग्निसंस्कारासाठी आवश्यक असलेल्या बेडच्या कामातील विलंब. परिणामी, भर पावसात नागरिकांना उघड्यावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ येत असून, लाखो रुपयांची ही वैकुंठभूमी सध्या केवळ रंगरंगोटी केलेली शोभेची वास्तू ठरल्याची तीव्र भावना शहरवासीयांत व्यक्त होत आहे.
समुद्रकिनाऱ्यालगत उभारण्यात आलेल्या या वैकुंठभूमीत प्रशस्त सभागृह, लाकूड साठवण्यासाठी गोडाऊन आणि चार अग्निसंस्कार बेडची सुविधा नियोजित करण्यात आली होती. तब्बल दोन वर्षे काम सुरू राहिल्यानंतर इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले. मात्र अग्निसंस्कारासाठी अत्यावश्यक असलेले बेड अद्याप बसवण्यात आलेले नाहीत. त्यामुळे संपूर्ण प्रकल्प असूनही नागरिकांना त्याचा कोणताही लाभ मिळत नाही.या बेडसाठी पंधराव्या वित्त आयोगातून सुमारे ३ लाख ९८ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. निविदेनुसार १० मिमी जाडीचे आय-बीम आणि भरीव जाळी वापरणे अपेक्षित असताना, ठेकेदाराने केवळ ४ मिमी जाडीचे निकृष्ट आय-बीम आणल्याचा प्रकार उघडकीस आला. नगरपंचायतीचे शाखा अभियंता आणि उपनगराध्यक्ष यांनी तातडीने पाहणी करून हे साहित्य परत पाठवण्याचे आदेश दिल्याने निकृष्ट साहित्य बसवण्याचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला. शहरात विकासकामे मूळ ठेकेदाराऐवजी अनुभव नसलेल्या उपठेकेदारांकडून करून घेतली जात असल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे कामांचा दर्जा खालावत असून प्रकल्प पूर्ण होण्यास सातत्याने विलंब होत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. दरम्यान, या कामामागे एका लोकप्रतिनिधीचा अप्रत्यक्ष हस्तक्षेप असल्याची चर्चा शहरात रंगली आहे. निकृष्ट साहित्य वापरण्याचा प्रयत्नही त्याच्याकडून झाल्याची चर्चा असून, प्रशासनाच्या ठाम भूमिकेमुळे तो डाव फसल्याचे बोलले जात आहे. आता योग्य दर्जाचे साहित्य आणून बेडचे काम कधी पूर्ण होणार, याकडे संपूर्ण गुहागरचे लक्ष लागले आहे. पावसाळ्याच्या तोंडावरही वैकुंठभूमी कार्यान्वित न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. “लाखो रुपये खर्च झाले, पण अंत्यसंस्कारासाठी अजूनही पावसात उभे राहावे लागते,” अशी संतप्त प्रतिक्रिया शहरवासीय व्यक्त करत आहेत. नागरिकांनी तातडीने काम पूर्ण करून वैकुंठभूमी सर्वांसाठी खुली करण्याची मागणी केली आहे.
















