गुहागर – प्रेम विवाह केला म्हणून ज्यांना मढाळ गावच्या पोलीस पाटलाने आणि तंटामुक्ती अध्यक्षांनी घराबाहेर जाण्याचे आदेश दिले. त्या जोडप्याने आपल्याला न्याय मिळत नाही म्हणून त्यांनी अखेर आज मुंबईकडे प्रयाण केले. मात्र एका नवविवाहित जोडप्याला आपण न्याय न देऊ शकलो याची खंत गावातील अनेक ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केली. त्याचवेळी जर लोकप्रतिनिधीनी व गावपुढारी व स्वयंघोषित पुढार्यांनी वेळीच सामंजस्याची भूमिका घेतली असती व पोलिसांनी व्यवस्थित लक्ष घालून हे प्रकरण सोडवले असते तर त्यांना न्याय मिळाला असता, असेही आता पंचक्रोशीतील नागरिकांकडून बोलले जात आहे.
एखाद्या व्यक्तीने प्रेम विवाह केला तर त्याला घरात न घेण्याच्या आदेश देणाऱ्या त्या पोलीस पाटला विरोधात सध्या सर्वत्र संताप आणि नाराजी व्यक्त करण्यात येते. याच पोलीस पाटलाला गुहागर पोलीस पाठीशी घालत असल्याचा आरोप गावातील ग्रामस्थ करत आहेत. त्यामुळे आता या नवविवाहित जोडप्याने आपला गावात थांबून काही उपयोग नाही. आता आपण मुंबईकडे कामधंदाच्या ठिकाणी जाऊ असा विचार करत मुंबईकडे प्रयाण केले. मात्र जातेवेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना असेही सांगितलं की, जर मुंबईमध्ये आमच्या जीवाचे काही बर वाईट झालं तर त्याला सर्वस्वी जबाबदार गावचा पोलीसपाटील व गावचे तंटामुक्ती अध्यक्ष हे असतील असे त्यांनी सांगितले. तर गावचा पोलीसपाटील हा गावातील तंटे मिटवण्यासाठी असतो. मात्र तोच जर गावातील तंट्यांना एक प्रकारे न मिटवता अशा प्रकारे घडणाऱ्या घटनांना पाठीशी घालत असेल तर, या पोलीस पाटलाबद्दल न बोललेलं बरं असे येथील काही ग्रामस्थ म्हणत आहेत.
गुहागर पोलिसांकडे याबाबत त्या नवविवाहित दांपत्याने तक्रार केली आहे. मात्र त्यांच्याकडे आलेल्या तक्रारीवर फक्त कायदा आणि सुव्यवस्था बिघडणार नाही याची नोटीस देऊन या प्रकरणाकडे गुहागर पोलिसांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप गावातील काही नागरिक करत आहेत. असा प्रकार घडत असेल आणि पोलीस जातीनिशी लक्ष देत नसतील तर यापुढे पोलिसांपुढे नक्की कोणते विषय घेऊन जायचे ? हा एक प्रश्न निर्माण झाला आहे, असे काही ग्रामस्थांमधून बोलले जात आहे.
सामाजिक संघटना, स्वयंघोषित पुढारी, लोकप्रतिनिधी आणि गावपुढारी यांनी जर या प्रकरणात लक्ष घातले असते तर त्या जोडप्याला नक्कीच न्याय मिळाला असता. त्यामुळे खरोखरच समाजात वावरताना हे लोकप्रतिनिधी, गावपुढारी व नेते हे आपले कर्तव्य विसरले की काय ? असा प्रश्न त्या निमित्ताने या ठिकाणी निर्माण होत आहे.
विधवा प्रथा बंद करून महिलांना सन्मानाची वागणूक देण्याचे ठराव मढाळ ग्रामपंचायतीने केला आहे. तरीसुद्धा त्याच गावातील एका नवविवाहितेला तिला स्वतःच्या घरापासून दूर ठेवण्यात येत आहे. हा माझ्यावर अन्याय आहे….. नवविवाहिता ( मढाळ )