चिपळूण – चिपळूण तालुक्यातील चिवेली ग्रामपंचायत हद्दीतील राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेच्या कामात आर्थिक अनियमितता झाल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी संबंधित अधिकाऱ्यांवर आणि जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. अन्यथा तीव्र लोकआंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, योजनेच्या अंमलबजावणीत निधीचा योग्य वापर झाला का, कामे नियमानुसार पूर्ण झाली का आणि पाणीपुरवठा समितीने आपल्या जबाबदाऱ्या पार पाडल्या का, याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. या संदर्भात यापूर्वी अनेक तक्रारी करूनही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाची विभागीय स्तरावर दखल घेण्यात आली असून, १६ जुलै रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणी आयोजित करण्यात आली आहे. तक्रारदारांसह संबंधित अधिकारी, तत्कालीन व विद्यमान अभियंते, ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी आणि तांत्रिक समितीच्या सदस्यांना सुनावणीस उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सुनावणीनंतर दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करून निधीतील कथित गैरव्यवहाराची सखोल चौकशी करावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. या प्रकरणाकडे आता संपूर्ण तालुक्यासह जिल्ह्याचे लक्ष लागले असून, सुनावणीनंतर प्रशासन कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
















