चिपळूण – फिटनेस, पर्यावरण संवर्धन आणि विठ्ठलभक्तीचा अनोखा संगम घडवून आणणारी कोकणातील पहिली चिपळूण–पंढरपूर सायकल वारी यंदा उत्साहात पार पडली. चिपळूण सायकलिंग क्लबचे विक्रांत आलेकर आणि प्रसाद आलेकर या बंधूंनी २०२२ मध्ये सुरू केलेल्या या उपक्रमाने यंदा यशस्वी चौथ्या वर्षात प्रवेश करत अधिक लोकप्रियतेची नोंद केली.
पहिल्या वर्षी अवघ्या १८ सायकलपटूंनी सुरू झालेल्या या वारीत यंदा तब्बल ३३ सायकलपटूंनी सहभाग घेतला. त्यामध्ये चिपळूण सायकलिंग क्लबचे २८ आणि दापोली सायकलिंग क्लबचे ५ सायकलपटू सहभागी झाले. विशेष म्हणजे, नऊ महिला सायकलपटूंनी नववारी साडी परिधान करून सायकल चालवत महिलांसाठी प्रेरणादायी संदेश दिला. १० जुलै रोजी चिपळूण येथून भक्तिमय वातावरणात वारीला सुरुवात झाली. अभंग, टाळ-मृदुंगाचा गजर, आरती आणि विठ्ठलनामाच्या जयघोषात सायकलपटूंनी पहिल्या दिवशी चिपळूण–कराड–विटा असा सुमारे १४० किलोमीटरचा टप्पा पूर्ण केला. दुसऱ्या दिवशी विटा–पंढरपूर हा ११० किलोमीटरचा प्रवास पूर्ण करत एकूण २५० किलोमीटरचे अंतर पार करून ११ जुलै रोजी सायंकाळी पंढरपूर येथे वारीची सांगता झाली.
वारीसोबतच अखिल भारतीय सायकल वारी समिती, पंढरपूर यांच्या ९० दिवसांच्या विशेष सायकलिंग चॅलेंजमध्येही चिपळूण सायकलिंग क्लबने उल्लेखनीय कामगिरी केली. क्लबचे अध्यक्ष प्रशांत दाभोळकर यांनी सातवा क्रमांक पटकावल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच मोठ्या संख्येने सहभाग नोंदवल्याबद्दल चिपळूण सायकलिंग क्लबलाही विशेष सन्मान प्रदान करण्यात आला.
या संपूर्ण उपक्रमासाठी सहभागींच्या मुक्कामाची, भोजनाची, सामान वाहतुकीची तसेच आपत्कालीन मदतीसाठी स्वतंत्र वाहनाची उत्कृष्ट व्यवस्था करण्यात आली होती. या नियोजनामुळे वारी सुरक्षित, शिस्तबद्ध आणि आनंददायी वातावरणात पार पडली.
अवघ्या दोन सायकलप्रेमी बंधूंच्या संकल्पनेतून सुरू झालेला हा उपक्रम आज कोकणातील सायकलप्रेमींसाठी प्रेरणास्थान ठरत आहे. विठ्ठलभक्तीबरोबरच आरोग्य, पर्यावरणपूरक जीवनशैली आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश देणारी ही सायकल वारी आता कोकणाची वेगळी ओळख बनत असून, पुढील वर्षी आणखी मोठ्या प्रमाणावर सहभागी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
















