गणपतीपुळे – आनंदाचे क्षण अनुभवण्यासाठी गणपतीपुळेच्या समुद्रकिनारी आलेल्या छत्रपती संभाजीनगर येथील पर्यटकांच्या सहलीवर शनिवारी दुःखाचा डोंगर कोसळला. समुद्राच्या प्रचंड लाटांमध्ये अडकून पाच पर्यटक बेपत्ता झाल्याने संपूर्ण परिसर हळहळ व्यक्त करत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर येथून १९ जणांचा गट गणपतीपुळे येथे फिरण्यासाठी आला होता. सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास काही पर्यटक समुद्रात उतरले. मात्र, समुद्रातील अचानक वाढलेला प्रवाह आणि खोल पाण्याचा अंदाज न आल्याने पाच जण लाटांच्या तडाख्यात सापडले आणि काही क्षणांतच समुद्राच्या गर्भात ओढले गेले.
घटनेची माहिती मिळताच किनाऱ्यावरील जीवरक्षक, स्थानिक ग्रामस्थ, व्यापारी आणि पोलीस कर्मचारी मदतीसाठी धावले. बुडणाऱ्या पर्यटकांना वाचवण्यासाठी अनेकांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून प्रयत्न केले. मात्र, समुद्रातील तीव्र प्रवाह आणि उंच लाटांमुळे बचावकार्यात मोठ्या अडचणी निर्माण झाल्या.
सध्या बेपत्ता पर्यटकांचा शोध घेण्यासाठी प्रशासन, पोलीस, जीवरक्षक आणि स्थानिक नागरिकांकडून युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू आहे. बोटी आणि अन्य साधनांच्या मदतीने समुद्रात शोधकार्य सुरू असून प्रत्येक क्षणासोबत नातेवाईकांची धाकधूक वाढत आहे.
या घटनेमुळे गणपतीपुळे परिसरात शोककळा पसरली आहे. आनंदाच्या सहलीसाठी घराबाहेर पडलेल्या कुटुंबांवर अचानक आलेल्या या संकटाने अनेकांच्या डोळ्यांत अश्रू उभे केले आहेत. समुद्राचे रौद्र रूप पुन्हा एकदा समोर आल्याने पर्यटकांनी समुद्रात उतरताना अधिक सतर्कता बाळगावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
Home महाराष्ट्र गणपतीपुळे येथे समुद्राच्या लाटांनी हिरावले पाच जीव; संभाजीनगरच्या कुटुंबांवर दुःखाचा डोंगर















