गुहागर – गणेशोत्सवा दरम्यान गुहागर तालुक्यातील सतत वर्दळीची असलेली शृंगारतळी बाजारपेठमध्ये वाहतूक व्यवस्था सुरळीत असून पोलिसांनी कौतुकास्पद कामगिरी केली आहे.
तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ शृंगारतळी या मंडळाने देखील त्यांच्या कार्याचे कौतुक केले आहे.मागील दोन वर्षे कोरोना संकटामुळे चाकरमनी आपल्या गावी गणेशोत्सवासाठी हजारोंच्या संख्येने आलेले आहेत, बहुसंख्य चाकरमनी गावी येताना आपली वाहने घेऊन आले. शृंगारतळी ही तालुक्याची मुख्य बाजारपेठ असल्याने सर्व ग्राहक खरेदीसाठी येत असतात, लाखो रुपयांची उलाढाल याठिकाणी होत असते, गणपती काळात देखील हजारो ग्राहक वाहने घेऊन याठिकाणी खरेदीसाठी येत आहेत, बाजारपेठमधील रस्त्यावर वाहने लावण्यास जागाच शिल्लक नसल्याचे दिसत आहे. जागेची अडचण असतानादेखील येथील वाहतूक पोलिसांनी नम्रपणे नागरिकांशी संवाद साधत सहकार्य करण्याची विनंती करत आहेत. येथील स्थानिक नागरिक पोलिसांच्या विनंतीला मान देत असून मुंबईकर काही ऐकण्याच्या मनःस्थितीत दिसत नाहीत, याचा थोडाफार परिणाम होताना दिसत असला तरी पोलीस सौजन्याने त्यांना समजविण्याचा प्रयत्न करत आहेत. सध्या सायंकाळी बाजारपेठेत गर्दी होत असते, त्याचप्रमाणे मुंबईला जाणाऱ्या वाहनांचीसुद्धा गर्दी होत असते, परंतु येथील पोलिसांच्या कार्यक्षमतेमुळे सर्व वाहने सुरळीत पणे मार्गस्थ होत आहेत. बाजार पेठेतील शृंगारतळीचा राजा पाहण्यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी होत आहे. याही भाविकांच्या गर्दीला नियंत्रण करण्याचे काम पोलिसांना करावे लागत आहे. आजमितीस कोणताही अनुचित प्रकार बाजारपेठेत झाला नाही. गुहागर पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक तुषार पाचपुते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पाटील, सहा.पो. उपनिरीक्षक प्रमोद मोहिते, पोलीस हेड कॉन्स्टेबल शिवलकर, पो.कॉन्स्टेबल उदय मोनये , वैभव चौगुले, प्रतीक राहाटे, होमगार्ड सूरज सावंत, प्रवीण काजारे, संकेत शितप आदी कर्मचारी दिवस रात्र वाहतूक सुरळीत करण्यासाठी मेहनत घेत आहेत.