गुहागर – मुसळधार पडणाऱ्या पावसाने तालुक्यातील वेळणेश्वर येथील समुद्रकिनारील लोकवस्तीत समुद्राच्या भरतीने पाणी शिरल्याची घटना शुक्रवारी घडली.
मात्र, यामध्ये कोणतेही नुकसान झाले नसल्याची माहिती गुहागर प्रशासनाने दिली आहे.गेले काही दिवस तालुक्याला मुसळधार पावसाने चांगलेच झोडपले आहे. यामुळे विविध ठिकाणी नुकसानीच्या घटना देखील वाढल्या आहेत. शुक्रवारी सकाळी मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने वेळणेश्वर येथील समुद्रकिनारील लोकवस्तीमध्ये समुद्राच्या भरतीचे पाणी शिरले. यावेळी येथील सुमारे पंधरा ते वीस मच्छिमार लोकांच्या घरामध्ये पाणी शिरले. मात्र, यामुळे कोणतेही नुकसान झाले नसल्याची माहिती गुहागर प्रशासनाने दिली आहे. यावेळी सुमारे ७ ते ८ मीटर उंचीच्या लाटा उसळत होत्या. या पाण्यामुळे नागरिकांचे वैयक्तिक बांधवाहून गेल्याची घटना घडली. तसेच समुद्रकिनारी मोठी धूप होऊन अनेक बागायतदारांच्या बागांची धूप तसेच बागांमध्ये पाणी शिरल्याने बागांचे नुकसान झाले. त्याचप्रमाणे या ठिकाणी असलेल्या हॉटेल व्यावसायिकांच्या पडवीमध्ये देखील पाणी शिरले.दरम्यान, सकाळी १० वाजता सुरू झालेली भरती दुपारी १.३० वाजता ओहोटी येण्याची अपेक्षा असताना उशिराने म्हणजेच २.३० वाजता ही ओहोटी आली. या घटनेची माहिती मिळताच येथील मंडळ अधिकारी मोरे, तलाठी राजेशिर्के, सरपंच चैतन्य धोपावकर यांनी पाणी शिरलेल्या भागांमध्ये पाहणी करून येथील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याच्या सूचना केल्या. यापूर्वीदेखील येथील समुद्रकिनारी नागरिकांना प्रशासनाने यापूर्वी स्थलांतरित होण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, शुक्रवारी शिरलेल्या समुद्राच्या पाण्यानंतर आता येथील नागरिकांना स्थलांतरित होण्याच्या सक्त सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.