गुहागर – विजांच्या कडकडाटसह एक-दीड तास पडलेल्या मुसळधार पावसामुळे गुहागर तालुक्यातील शृंगारतळी बाजारपेठेत सर्वत्र पाणीच पाणी झाले.
शृंगारतळीला थोडक्यात “तळी” म्हणून संबोधले जाते. याच तळीचा एक तास पडलेल्या पावसामुळे तलाव झाल्याचे चित्र होते. तसेच दुकानांमध्येही पाणी शिरले तर शृंगारीरोडचे नदीत रुपांतर झाले. विजांच्या मोठ्या कडकडाटने नागरीकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले.गुहागर-विजापूर महामार्गाचे रुंदीकरण होण्यापूर्वीही या बाजारपेठेमध्ये पावसाचे पाणी साठत होते; परंतु या महामार्गाच्या रुंदीकरणामुळे हि समस्या दूर होईल, असे नागरिकांना वाटत होते. प्रत्यक्षात मात्र चित्र पालटले आहे. या कामामध्ये अतिशय चुकीच्या पद्धतीने गटारांचे बांधकाम करण्यात आले आहे. त्यामुळे पावसाच्या पाण्याचा योग्य पद्धतीने निचरा होत नसून संपूर्ण पाणी रस्त्यावरून वाहत आहे.