गुहागर – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले ) जिल्हा रत्नागिरी या राजकीय पक्षातर्फे १ ते २० पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा घेतलेला शासन निर्णय मागे न घेतल्यास रिपब्लिकन पक्षातर्फे तीव्र आंदोलन छेडण्याचा गंभीर ईशारा रिपब्लिकन (आठवले) पक्षाचे रत्नागिरी जिल्हा प्रवक्ते अनंतराव पवार यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नाम. एकनाथ शिंदे यांना लेखी पत्राव्दारे ईमेल आणि रजिस्टर पत्र पाठवून दिला असून या लेखी पत्राची ईमेलव्दारे मुख्यमंत्री कार्यालयाने त्वरीत दखल घेऊन कार्यवाहीसाठी शालेय शिक्षण आणि क्रिडा विभाग यांना पाठवीण्यात आला असल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयातून ईमेलव्दारे प्राप्त झाली आहे, अशी माहिती रत्नागिरी जिल्हा प्रवक्ते अनंत पवार यांनी दिली.
त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, रत्नागिरी सारखा अतिग्रामीण, अतिदुर्गम, डोंगराळ, विरळ लोकसंख्येच्या भागामध्ये १ ते २० पटसंख्या असणाऱ्या शाळांची संख्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये १३७५ आहे. या शाळांच्या व्यवस्थापनावर होणारा खर्च ही खूप मोठा आहे याचे भान आम्हाला आहे. रत्नागिरी सारख्या भौगोलिकदृष्ट्या प्रतिकूल परिस्थितीचा विचार करता १ ते २० पटसंख्या असलेल्या काही शाळांच्या ३ ते ५ कि.मी. अंतराच्या परिसरामध्ये दुसरी शाळा उपलब्ध नाहीत. १ ते २० पटसंख्या असलेल्या काही शाळांच्या १ ते २ कि.मी. अंतरामध्ये शाळा उपलब्ध आहेत, परंतु सदरच्या अंतरामध्ये घनदाट जंगल, नद्या नाले, हिंस्त्र प्राणी, डोंगराळ भाग, अशा एक नव्हे अनेक समस्यांना विद्यार्थ्यांना सामोरे जावे लागणार आहे.