चिपळूण – चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेने १९ ऑक्टोबर २०२२ रोजी वर्धापन दिनापर्यंत १ हजार कोटी ठेवींचा टप्पा गाठण्याचा निर्धार केला आहे.
या धर्तीवर ‘हर घर चिपळूण नागरी’ या मोहिमे अंतर्गत सभासद १ हजार रुपयांपासून संस्थेच्या सभासदांनी ‘आपली माणसं आपली संस्था’ या उक्तीप्रमाणे ठेव योजनेत सहभागी होऊन खारीचा वाटा उचलावा, असे आवाहन करतांना गरजूंनादेखील सुलभ पध्दतीने तात्काळ कर्ज उपलब्ध करून दिले जाईल, अशी माहिती संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांनी दिली.यावेळी ते पुढे म्हणाले की, चिपळूण नागरी पतसंस्थेने सुरुवातीपासूनच सर्वसामान्यांना बचतीची सवय व्हावी यासाठी सुमारे ३१ ठेव योजना सुरू केल्या आहेत. नुसते ठेवी स्वीकारण्याच्या हेतू नसून या ठेवीदारांना देखील योग्य तो परतावा दिला जातो. गेल्या काही वर्षांपासून संस्थेच्या धनलक्ष्मी, श्री स्वामी समर्थ, सिद्धी, संकल्प, श्रावण मास, समृद्धी, गणेश, उत्कर्ष, धनसंचय, सुयश, अल्पमुदत, मुदत, आवर्त, धनवर्धिनी, स्वावलंबी, दुप्पट, दाम दुप्पट, निवृत्ती या योजना सुरू आहेत. या योजनांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून ३ लाख ९ हजार ३७४ सदस्य या योजनेचे सदस्य झाले आहेत. या संस्थेच्या ३१ ठेव योजना असून यामध्ये १० मासिक ठेव योजना आहेत. तर उर्वरित २१ मुदत ठेव योजना आहेत. मासिक ठेव योजनेत ३९ हजार ४८ खातेदार दरमहा सुमारे ५ कोटी रुपये जमा करीत आहेत. तसेच काही दिवसांपूर्वी ‘ झालेल्या संकल्प २०२३ व सहकार अर्थ साक्षर मेळाव्यात’ ‘राष्ट्र अमृत महोत्सवी ठेव’ योजनेची घोषणा केली होती. या योजनेच्या अंमलबजावणीस १ ऑगस्ट पासून सुरुवात झाली असून सभासदांचा या योजनेला देखील उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांनी यावेळी दिली.तर तर दुसरीकडे संस्थेच्या नेहमीच्या आर्थिक व्यवहारांबरोबरच सामाजिक बांधिलकी देखील जपण्याचा वेळोवेळी प्रयत्न केला आहे. यामध्ये कोविड काळात मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी १ कोटी रुपयांचा धनादेश देऊन सामाजिक दायित्व जपून सर्वांसमोर आदर्श ठेवला आहे. इतका निधी देणारी चिपळूण नागरी पतसंस्था ही महाराष्ट्रात एकमेव ठरली आहे, याचा आम्हा सर्वांना सार्थ अभिमान आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. यानंतर गतवर्षी झालेल्या २२ जुलै २०२१ च्या महापुरात संस्थेच्या सभासदांचे झालेले नुकसान पाहता या सर्वांना मोलाचा हात देण्यासाठी संस्थेच्या माध्यमातून नुकसानग्रस्त सभासदांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करून दिलासा देण्याचा प्रयत्न केला गेला, अशी माहिती देखील यावेळी दिली. ते आणखी पुढे म्हणाले की, शासनाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘हर घर तिरंगा’ याची घोषणा केली आहे. या उक्तीप्रमाणे संस्थेने १ हजार कोटी ठेवींचा टप्पा १९ ऑक्टोबर २०२२ वर्धापन दिनापर्यंत गाठण्यासाठी ‘हर घर चिपळूण नागरी’ ही संकल्पना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या मोहिमे अंतर्गत संस्थेचे सभासद १ हजार रुपयांपासून ३१ ठेव योजनेतील एका ठेव योजनेत सहभाग घेऊ शकतात अशी माहिती यावेळी दिली. तरी संस्थेच्या सभासदांनी १ हजार कोटी ठेवींचा टप्पा गाठण्यासाठी खारीचा वाटा उचलावा, असे आवाहन संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण व मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. स्वप्ना यादव यांनी केले आहे. तसेच गरजूंना सुलभ पध्दतीने तात्काळ कर्ज उपलब्ध करून दिले जाईल, असेही यावेळी सांगितले.