गुहागर – रत्नागिरी जिल्ह्यातील अंजनवेल येथील ऐतिहासिक गोपाळगड किल्ल्याचे सर्वांगीण संवर्धन करून त्याला पूर्वीचे वैभव प्राप्त करून देण्यासाठी स्थानिक दुर्गप्रेमी दीपक वैद्य यांनी रत्नागिरी विभागीय पुरातत्त्व कार्यालयाचे सहाय्यक संचालक विलास वाहणे यांना सविस्तर १२ सूत्री निवेदन सादर केले आहे. न्यायालयीन लढ्याद्वारे गोपाळगड किल्ला खाजगी अतिक्रमणातून मुक्त करण्यासाठी पुरातत्त्व विभागाने बजावलेल्या भूमिकेचे कौतुक करत, आता प्रत्यक्ष संवर्धनाची कामे तातडीने सुरू करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
गोपाळगड किल्ल्याची संपूर्ण शासकीय मोजणी करून तटबंदीबाहेरील ऐतिहासिक क्षेत्राचाही समावेश करून उर्वरित खाजगी जागेचे भूसंपादन करणे,. संपूर्ण परिसर राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करून पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारीत कायमस्वरूपी ठेवावा. किल्ल्यातील ऐतिहासिक विहिरी, बारव, वाड्यांचे जोते आणि अन्य अवशेष यांचे वैज्ञानिक पद्धतीने जतन व पुनरुज्जीव करणे, विशेषतः माती व दगड टाकून बुजविण्यात आलेल्या गोड्या पाण्याच्या बारवा पुन्हा खुल्या करून त्या अंजनवेल गावासाठी पाण्याचा स्रोत उपलब्ध करून देणे. किल्ल्यात अतिक्रमण काळात लावण्यात आलेली आंब्याची झाडे संवर्धनाच्या कामात अडथळा ठरत असतील तर ती हटवून मूळ ऐतिहासिक स्वरूप पुनर्स्थापित करावीत. गोपाळगडवर पुरातन शस्त्रसंग्रहालय, वस्तुसंग्रहालय, वाचनालय आणि इतिहास अभ्यासिका उभारून किल्ल्याला ऐतिहासिक व शैक्षणिक केंद्र म्हणून विकसित करावे, तसेच वीजपुरवठा, स्वच्छतागृह, उपहारगृह, कचरा व्यवस्थापन, सीसीटीव्ही यंत्रणा, सौरऊर्जेवरील पथदिवे अशा मूलभूत पर्यटन सुविधा निर्माण करण्याची मागणीही करण्यात आली आहे. किल्ल्यावर सुरक्षा रक्षक, पर्यटक मार्गदर्शक, सफाई कर्मचारी व इतर पदांची भरती करताना अंजनवेलमधील पात्र स्थानिक युवकांना प्राधान्य द्यावे, अशीही अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
इतिहासातील पराक्रमी सरदार व शासक यांच्या कार्याची माहिती देणारे मोठे माहितीफलक उभारावेत. तसेच छत्रपती शिवाजी महाराज आणि सरखेल तुळोजी आंग्रे यांचे भव्य स्मारक व पुतळे उभारण्यात यावेत, इ.स. १७०८ सालचा गोपाळगडशी संबंधित फारसी भाषेतील ऐतिहासिक शिलालेख सध्या मुंबईतील Chhatrapati Shivaji Maharaj Vastu Sangrahalaya येथे असून तो सन्मानपूर्वक पुन्हा गोपाळगडावर आणून मराठी अनुवादासह पर्यटकांसाठी खुला करावा, पूर्वी किल्ल्यावर असलेल्या तोफांपैकी सध्या उर्वरित चार तोफा अंजनवेल गावात इतरत्र ठेवण्यात आल्या असून त्या पुन्हा किल्ल्यावरील चार प्रमुख बुरुजांवर कायमस्वरूपी बसविण्यात याव्यात, याशिवाय दरवर्षी शिवजयंती तसेच २३ जानेवारी हा सरखेल तुळोजी आंग्रे यांनी गोपाळगड जिंकलेल्या पराक्रम दिनानिमित्त पुरातत्त्व विभाग, शासन, दुर्गप्रेमी संस्था आणि ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने शासकीय कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत, अशीही सूचना करण्यात आली आहे.
संवर्धनाच्या कोणत्याही कामाला सुरुवात करण्यापूर्वी दुर्गप्रेमी, स्थानिक ग्रामस्थ आणि संबंधित संस्थांची संयुक्त बैठक रत्नागिरी विभागीय पुरातत्त्व कार्यालय, गुहागर तहसील कार्यालय किंवा प्रत्यक्ष गोपाळगड किल्ल्यावर आयोजित करून सर्वांच्या सूचना व मते विचारात घ्यावीत, अशी शेवटची महत्त्वपूर्ण मागणीही दीपक वैद्य यांनी केली आहे. गोपाळगड किल्ला अतिक्रमणमुक्त झाल्यानंतर आता त्याचे ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि पर्यटनदृष्ट्या पुनरुज्जीवन करण्यासाठी हे निवेदन महत्त्वपूर्ण ठरणार असून, पुरातत्त्व विभाग या मागण्यांवर काय भूमिका घेतो याकडे दुर्गप्रेमींसह संपूर्ण कोकणाचे लक्ष लागले आहे.















