‘लेखणी’च्या ताकदीला ग्रामस्थांचा मुजरा; चिवेली फाट्यावर अनोखा फलक

0
1
बातम्या शेअर करा

चिपळूण – प्रशासनाच्या दिरंगाईविरोधात आवाज उठवताना आणि भ्रष्टाचाराच्या प्रकरणाला वाचा फोडताना पत्रकारितेची भूमिका किती महत्त्वाची असते, याचा प्रत्यय चिवेली येथे आला आहे. चिवेली येथील नळपाणी योजनेतील कथित आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणात सुरुवातीपासून शेवटपर्यंत ग्रामस्थांच्या बाजूने ठामपणे उभे राहून आपल्या लेखणीतून प्रशासनाला जागे करणाऱ्या पत्रकारांचा ग्रामस्थांनी अनोख्या पद्धतीने सन्मान केला आहे.

या प्रकरणातील विविध टप्प्यांवर प्रकाशित झालेल्या वृत्तपत्रांतील बातम्यांचे कात्रण एकत्र करून चिवेली फाटा येथे भव्य फलक लावण्यात आला असून, या माध्यमातून संबंधित सर्व पत्रकार आणि त्यांच्या वृत्तपत्रांचे जाहीर आभार मानण्यात आले आहेत. ग्रामीण भागात पत्रकारांच्या कार्याची अशा प्रकारे सार्वजनिक दखल घेणारा फलक प्रथमच पाहायला मिळाल्याने या उपक्रमाची सर्वत्र चर्चा रंगली आहे. चिवेली नळपाणी योजनेतील कथित गैरव्यवहाराबाबत प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करण्यात आल्या. मात्र, प्रशासकीय पातळीवर अपेक्षित वेगाने कारवाई होत नसताना पत्रकारांनी आपल्या लेखणीतून हा मुद्दा सातत्याने लावून धरला. विविध वर्तमानपत्रांनी या प्रकरणातील प्रश्न, ग्रामस्थांच्या मागण्या आणि प्रशासनाच्या भूमिकेवर प्रकाश टाकत संबंधित यंत्रणेला जाब विचारला. पत्रकारांच्या सातत्यपूर्ण वृत्तांकनामुळे हा विषय केवळ एका गावापुरता मर्यादित राहिला नाही, तर प्रशासनाच्या वरिष्ठ पातळीपर्यंत पोहोचला. अखेर विभागीय आयुक्तांच्या सुनावणीत तांत्रिक चौकशीतील गंभीर बाबी समोर आल्या. चौकशी अहवालानुसार 44.85 लाख रुपयांच्या मंजूर कामापैकी प्रत्यक्ष झालेल्या कामांचे मूल्य सुमारे 11.91 लाख रुपये, तर प्रत्यक्ष जागेवर न झालेल्या कामांचे मूल्य सुमारे 32.94 लाख रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या सुनावणीनंतर विभागीय आयुक्तांनी प्रकरणाची गंभीर दखल घेत अपहारास जबाबदार असलेल्या तत्कालीन पाणीपुरवठा समितीचे अध्यक्ष-सचिव तसेच संबंधित शाखा अभियंता, उपअभियंता आणि तत्कालीन कार्यकारी अभियंता यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करून अपहाराची रक्कम वसूल करण्याची कार्यवाही तात्काळ करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणात जिल्हा परिषद स्तरावर झालेला विलंबही ‘अक्षम्य’ असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

या संपूर्ण संघर्षात पत्रकारांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता ग्रामस्थांच्या प्रश्नांना व्यासपीठ मिळवून दिले, अशी भावना चिवेली ग्रामस्थांनी व्यक्त केली. बातमी प्रसिद्ध करून विषय विसरून न जाता, प्रशासनाकडून कारवाई होईपर्यंत या प्रकरणाचा पाठपुरावा करणाऱ्या पत्रकारांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा फलक उभारण्यात आला आहे. या उपक्रमासाठी तक्रारदार विद्याधर साळुंखे यांनी विशेष पुढाकार घेतला असून ग्रामस्थांच्या सहकार्याने हा फलक उभारण्यात आला आहे. फलकावर या प्रकरणासंदर्भात प्रसिद्ध झालेल्या विविध वर्तमानपत्रांतील बातम्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. त्यामुळे एका बाजूला भ्रष्टाचाराविरोधातील संघर्षाची कहाणी तर दुसऱ्या बाजूला पत्रकारितेच्या सामाजिक बांधिलकीची जाणीव, असा दुहेरी संदेश या फलकातून देण्यात आला आहे.सामान्यतः राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते किंवा विविध संस्थांच्या अभिनंदनाचे फलक ग्रामीण भागात पाहायला मिळतात. मात्र, ग्रामस्थांनी पत्रकारांच्या लेखणीचे जाहीर कौतुक करण्यासाठी उभारलेला हा फलक विशेष लक्षवेधी ठरला आहे. “आमच्या प्रश्नाला आवाज देणाऱ्या आणि प्रशासनाला जागे करणाऱ्या पत्रकारांचे आभार मानणे ही आमची सामाजिक जबाबदारी आहे,” अशी भावना ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे. भ्रष्टाचाराविरोधात ग्रामस्थांचा संघर्ष आणि त्याला पत्रकारितेने दिलेली साथ यांचे प्रतीक ठरलेला चिवेली फाट्यावरील हा फलक सध्या परिसरात चर्चेचा विषय बनला असून, ‘लेखणीची ताकद काय असते?’ याचे जिवंत उदाहरण म्हणून त्याकडे पाहिले जात आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here