चिपळूण – गेल्या अनेक दिवसांपासून रामदास कदम नाराज असल्याची चर्चा होती. त्यात एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेत उभी फूट पडत असल्याचं चित्र निर्माण झालं.
रामदास कदम यांचे चिरंजीव आमदार योगेश कदम हे शिंदे गटात उघडपणे सहभागी झाले. रामदास कदम यांच्या राजीनाम्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. “52 वर्षे मी कामं केलं पण माझ्यावर नेतेपदाचा राजीनामा देण्याची वेळ येईल असं कधी स्वप्नात देखील वाटलं नव्हतं. आयुष्याची संध्याकाळ अंधारमय होईल असं कधीच वाटलं नव्हतं” हे सांगताना रामदास कदम अत्यंत भावूक झालेले पाहायला मिळाले. याच दरम्यान भास्कर जाधव य़ांनी प्रतिक्रिया दिली आहे.“रामदास कदम य़ांना योग्यवेळी एकदा रोखठोक उत्तर देणार” असा इशारा भास्कर जाधव यांनी दिला आहे. शिवसेनेचं काही चुकतं का? असा प्रश्न भास्कर जाधव यांना विचारण्यात आला होता. त्यावर “याबाबत सविस्तर मी एकदा बोलणार आहेत. परंतू आज मी सगळ्या गोष्टींवर लक्ष ठेवून आहे, सगळी परिस्थिती मी पूर्णपणे नजरेखालून घालतोय. कोण कोण कशाबाबतीत यासंदर्भात आपापली मतं मांडतोय हे मी बघतोय. रामदास कदमांना मला एकदा रोखठोक उत्तर द्यावं लागेल आणि ते योग्यवेळी मी देणार आहे” असं म्हटलं आहे.