रत्नागिरी – नागरिकांना शासकीय सेवा वेळेत, पारदर्शक आणि परिणामकारक पद्धतीने उपलब्ध करून देण्यात रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने राज्यात आपला दबदबा निर्माण केला आहे. महाराष्ट्र शासनाच्या ‘महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम’ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या ‘आपले सरकार पोर्टल’ सेवेच्या मूल्यमापनात रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने सलग दोन महिने राज्यातील सर्व जिल्हा पोलीस दलांना मागे टाकत अव्वल क्रमांक पटकावला आहे.
जून आणि जुलै २०२६ या दोन्ही महिन्यांत नागरिकांना देण्यात आलेल्या सेवांचा वेग, अर्ज निपटारा, गुणवत्ता आणि नागरिकांचे समाधान या विविध निकषांवर रत्नागिरी पोलिसांनी उत्कृष्ट कामगिरी केली. त्यामुळे नागरिकाभिमुख आणि पारदर्शक पोलीस सेवेला पुन्हा एकदा राज्यस्तरीय मानांकन मिळाले आहे.
जून २०२६ मध्ये रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाकडे एकूण १,७२३ अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी तब्बल १,६१० अर्जांचा विहित मुदतीत यशस्वी निपटारा करण्यात आला. ‘Citizens Overall Performance’ या श्रेणीत रत्नागिरी जिल्ह्याने राज्यात प्रथम क्रमांक मिळवला. याचबरोबर Timeliness Score मध्ये १५.३२ गुण, तर Highest Citizen Score मध्ये १०.७२ गुण मिळवत जिल्हा पोलीस दलाने आपल्या कार्यक्षमतेची छाप उमटवली.
जून महिन्यात मिळवलेले अव्वल स्थान रत्नागिरी पोलिसांनी जुलैमध्येही कायम राखले. जुलै २०२६ मध्ये जिल्हा पोलीस दलाकडे १,८०७ अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी १,७१२ अर्जांचा विहित वेळेत यशस्वी निपटारा करण्यात आला. ‘Overall Top Performing Service’ आणि ‘Service with Highest Citizen Score’ या दोन्ही प्रमुख श्रेणींमध्ये रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने सलग दुसऱ्या महिन्यात प्रथम क्रमांक मिळवला. जुलै महिन्यात Timeliness Score मध्ये ५०.६४ गुण, तर Citizen Score मध्ये ३५.६६ गुण मिळवत पोलीस दलाने जूनच्या तुलनेत आणखी प्रभावी कामगिरी नोंदवली.
नागरिकांच्या विश्वासाला पोलीस दलाची पावती
लोकसेवा हक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करताना नागरिकांच्या अर्जांचा वेळेत निपटारा, सेवांमध्ये पारदर्शकता आणि नागरिकांचे समाधान याला रत्नागिरी पोलिसांनी प्राधान्य दिले. या सातत्यपूर्ण कार्यपद्धतीमुळे जिल्हा पोलीस दलाला राज्यस्तरावर हे उल्लेखनीय यश मिळाले आहे.या कामगिरीमागे रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांचे मार्गदर्शन तसेच जिल्ह्यातील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची तत्परता, शिस्तबद्ध कार्यपद्धती आणि नागरिकाभिमुख दृष्टिकोन महत्त्वाचा ठरला आहे.
‘जलद आणि पारदर्शक सेवा’ देण्याची ग्वाही
या राज्यस्तरीय यशाबद्दल पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक होत असून, नागरिकांना भविष्यातही अधिक जलद, पारदर्शक, गुणवत्तापूर्ण आणि प्रभावी सेवा उपलब्ध करून देण्यासाठी रत्नागिरी जिल्हा पोलीस दल सदैव कटिबद्ध राहील, अशी ग्वाही पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे यांनी दिली.
.
















