जालना- राज्यात कोरोना रुग्णसंख्या वाढल्यास पुन्हा मास्कसक्ती करावी लागेल असा इशारा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला.
महाराष्ट्र दिनानिमित्त जालना येथे टोपे यांच्याहस्ते काल ध्वजारोहण झाले. त्याप्रसंगी ते माध्यमांशी बोलत होते.सुरक्षेच्या दृष्टिकोनातून नागरिकांनी मास्कचा वापर केला पाहिजे असे आवाहनही आरोग्यमंत्री टोपे यांनी यावेळी केले.’राज्यात सध्या कोरोना रुग्णसंख्या कमी आहे. रुग्णसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्र देशात आठव्या क्रमांकावर आहे. सध्यातरी चिंता करण्यासारखी परिस्थिती नाही. चांगल्या पध्दतीने झालेल्या लसीकरणाचा हा परिणाम आहे. सर्व वयोगटातील नागरिकांचे लसीकरण केले जाणार असून केंद्र सरकारकडून तशा सूचना आल्यानंतर त्याप्रमाणे त्याचे नियोजन केले जाईल.’ असे आरोग्यमंत्री टोपे याप्रसंगी म्हणाले.