विद्यार्थ्यांच्या संघर्षाला गुहागरकरांचा सलाम; आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली

0
177
बातम्या शेअर करा


गुहागर – नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणानंतर देशभर पेटलेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर संघर्षादरम्यान आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांना गुहागरमध्ये अत्यंत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. “आम्ही गुहागरकर” या बॅनरखाली आयोजित कार्यक्रमात विद्यार्थी, पालक, नागरिक आणि विविध सामाजिक संघटनांनी मोठ्या संख्येने सहभागी होत विद्यार्थ्यांच्या न्याय्य लढ्याला पाठिंबा दर्शविला. दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांच्या आंदोलनावेळी झालेल्या लाठीमाराच्या घटनेचा निषेध व्यक्त करत तसेच विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांना शासनाने मान्यता दिल्याबद्दल समाधान व्यक्त करण्यासाठी सोमवारी सकाळी गुहागर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात हा श्रद्धांजली कार्यक्रम पार पडला. यावेळी आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांना मौन पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांवर ओढवलेल्या मानसिक तणावाबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली. शिक्षण व्यवस्थेत पारदर्शकता, न्याय आणि विद्यार्थ्यांचा विश्वास टिकविण्यासाठी शासनाने अधिक ठोस उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांच्या मागण्यांची दखल घेत शासनाने सकारात्मक निर्णय घेतल्याबद्दल आभारही मानण्यात आले.
यावेळी “आपली एकजूट, आपली संवेदना आणि आपली जबाबदारी हाच खरा गुहागरचा अभिमान आहे,” असा संदेश उपस्थितांनी दिला. विविध क्षेत्रातील नागरिकांनी या कार्यक्रमात सहभागी होत विद्यार्थ्यांच्या संघर्षाशी एकात्मता व्यक्त केली.
या श्रद्धांजली कार्यक्रमाला मनसे गुहागर तालुका संपर्कप्रमुख व जिल्हा परिषद सदस्य प्रमोद गांधी, पंचायत समिती सदस्य संदीप गोरीवले, ॲड. संकेत साळवी, मनसे उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर, आमिष कदम, उपसरपंच आसीम साल्हे, अमित कुबडे, अजित बेलवलकर, शोएब मालाणी, साबीर साल्हे, सुदेश हडकर, संतोष सोलकर, पंकज दळवी, भूषण पवार, पंकज बिर्जे, मयूर गमरे, मृणाल रूमडे, अमोल जामसुतकर, क्रांती साळवी, सोहम सातार्डेकर, वरवेलीचे सरपंच नारायण आग्रे आरेचे सरपंच समित घाणेकर, शशिकांत जाधव, प्रभुनाथ देवळेकर यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी, पालक, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठीचा लढा हा केवळ विद्यार्थ्यांचा नसून संपूर्ण समाजाचा असल्याचा ठाम संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला. गुहागरकरांनी दाखविलेली एकजूट आणि विद्यार्थ्यांप्रती व्यक्त केलेली संवेदना ही समाजातील सकारात्मक जागरूकतेचे प्रतीक असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here