सहकार क्षेत्रात रत्नागिरी जिल्हा बँकेची भरारी; आमदार सामंत यांचे कौतुक

0
35
बातम्या शेअर करा

रत्नागिरी – रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये नोंदविलेल्या उल्लेखनीय प्रगतीबद्दल समाधान व्यक्त करत आमदार किरण (भैय्या) सामंत यांनी बँकेचे अध्यक्ष, संचालक मंडळ, अधिकारी व कर्मचारी यांचे विशेष अभिनंदन केले आहे. बँकेच्या उज्ज्वल वाटचालीचे कौतुक करत त्यांनी भविष्यातील प्रगतीसाठी शुभेच्छाही दिल्या आहेत.
आमदार सामंत यांनी पाठविलेल्या अभिनंदनपर पत्रात नमूद केले आहे की, बँकेने आर्थिकदृष्ट्या सक्षम कामगिरी करत आधुनिक व अद्ययावत बँकिंग सेवांचा विस्तार केला आहे. विशेषतः ग्रामीण भागातील नागरिक, शेतकरी आणि सर्वसामान्य ग्राहकांना डिजिटल बँकिंगशी जोडण्यासाठी राबविण्यात आलेले उपक्रम सहकार क्षेत्रासाठी प्रेरणादायी आहेत.
बँकेच्या यशामागे हितचिंतक, ग्राहक, ठेवीदार, विविध पतसंस्था, मच्छीमार, शेतकरी, सभासद तसेच अधिकारी व कर्मचारी यांचे योगदान मोलाचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. सर्वांच्या विश्वास, परिश्रम आणि सहकार्यामुळेच रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने राज्यातील सहकार क्षेत्रात एक आदर्श निर्माण केल्याचे त्यांनी म्हटले आहे.
बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांच्या प्रभावी नेतृत्वासह संपूर्ण संचालक मंडळ, अधिकारी आणि कर्मचारी यांच्या सुयोग्य नियोजन, कार्यक्षम अंमलबजावणी व समन्वयामुळे ही यशस्वी घोडदौड शक्य झाली असल्याचेही सामंत यांनी पत्रात नमूद केले.
येत्या काळात बँकेने ₹६,००० कोटींच्या व्यवसायाचे उद्दिष्ट निश्चित केले असून, हे महत्त्वाकांक्षी लक्ष्य पूर्ण करण्यासाठी संचालक मंडळ, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्यांनी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक राज्यातील अग्रगण्य आणि आदर्श सहकारी बँक म्हणून अधिक वेगाने प्रगती करत राहो, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. आमदार किरण सामंत यांच्या या सकारात्मक, प्रोत्साहनपर आणि आपुलकीच्या पत्राचे बँकेच्या अध्यक्ष, संचालक, अधिकारी व कर्मचारी वर्गाने स्वागत केले असून, त्यांच्या शुभेच्छा आणि विश्वासाबद्दल सर्वांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.

जाहिरात

बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here