बातम्या शेअर करा


संगमेश्वर – खाकी वर्दी म्हणजे केवळ कायदा-सुव्यवस्थेचे प्रतीक नव्हे, तर समाजाशी जिव्हाळ्याचे नाते जपणारी संवेदनशील व्यवस्था आहे, याची प्रचिती रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी आपल्या अनोख्या कृतीतून दिली. संगमेश्वर तालुक्यातील मानसकोंड येथे त्यांनी थेट चिखलात उतरून शेतकऱ्यांसोबत भातलावणी केली आणि बळीराजाच्या कष्टाला प्रत्यक्ष सलाम ठोकला.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरून जात असताना मानसकोंड परिसरातील शेतात सुरू असलेली भातलावणी त्यांच्या नजरेस पडली. कोणताही ताफा, औपचारिकता किंवा पूर्वनियोजन न ठेवता त्यांनी वाहन थांबवले आणि थेट शेतात प्रवेश केला. शेतकऱ्यांशी हस्तांदोलन करत त्यांनी त्यांच्या अडचणी, शेतीतील बदल, पावसाचे स्वरूप आणि भातशेतीतील आव्हानांवर मनमोकळा संवाद साधला. संवादापुरते न थांबता बगाटे यांनी स्वतः हातात भाताची रोपे घेत शेतकऱ्यांसोबत चिखलात उतरून भातलावणी केली. त्यांच्या या अनपेक्षित सहभागामुळे शेतकरी आणि ग्रामस्थ सुखद आश्चर्यचकित झाले. उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत करत या कृतीचे कौतुक केले.
यावेळी बगाटे यांनी कोकणातील भातशेती ही केवळ शेती नसून येथील संस्कृती, परंपरा आणि अर्थव्यवस्थेचा कणा असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांच्या श्रमाचे मोल ओळखून त्यांच्या समस्या जाणून घेणे ही प्रशासनाचीही जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले.
समाजाभिमुख आणि लोककेंद्रित पोलिसिंगचा आदर्श घालून देणारी ही कृती जिल्हाभर चर्चेचा विषय ठरली आहे. पोलीस आणि जनतेतील विश्वासाचे नाते अधिक दृढ करणारा हा उपक्रम असल्याची भावना शेतकरी, ग्रामस्थ आणि विविध सामाजिक स्तरांतून व्यक्त करण्यात येत आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here