मुंबई – एकामागोमाग एक येणाऱ्या उष्णतेच्या लाटांमुळे यंदा मार्च ते एप्रिल या दोन महिन्यांच्या कालावधीत राज्यात २५ जणांचा उष्माघाताने मृत्यू झाला, तर ३७४ जणांना उष्माघाताची बाधा झाली.
मृतांची ही संख्या गेल्या आठ वर्षांतील सर्वाधिक आहे. यापैकी सर्वाधिक म्हणजे सुमारे ४४ टक्के मृत्यू नागपूरमध्ये झाले आहेत.यावर्षी एप्रिलमध्ये तिसऱ्यांदा उष्णतेची लाट आली आहे. विदर्भात अकोला, ब्रह्मपुरी आदी भागांमध्ये तर तापमान ४५ अंश सेल्सिअसच्याही पुढे गेले आहे. परिणामी विदर्भात उन्हाच्या तडाख्याने नागरिक हैराण झाले आहेत. गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यंदाचा उन्हाळा तीव्र असल्यामुळे उष्माघाताची बाधा झालेल्या रुग्णांची संख्याही वाढली आहे.