महाराष्ट्राच्या आजपर्यंतच्या जडणघडणीमध्ये इथल्या मातीतल्या प्रत्येक मराठी माणसाचा मोलाचा वाटा राहिला आहे.महाराष्ट्राचा विकासाकरिता आजपर्यंत अनेक प्रकल्प राबविले गेले.
कोकणातला माणुस तसा हळवा, आपल्या महाराष्ट्राच्या विकासासाठी त्यांच्या वाडवडिलांनी वसवलेली गाव सोडून शासनाला कोणत्याही प्रकारचा विरोध न करता आपली घरदारं आणि शेती सोडून दुस-या गावात वसल्यावर प्रकल्पग्रस्त म्हणुन शासनाने जाहिर केलेल्या सोयी इथल्या निवडणुकीतील वचनांप्रमाणे विरत जातात.पाचांबे हे गाव रत्नागिरी जिल्हयातील संगमेश्वर तालुक्यातील निसर्गाच्या सानिध्यात होते. इथला प्रत्येकजण शेती करत होता. गावात धरण झाले आणि येथील नागरिकांसमोर मोठे संकट उभे राहिले. येथील जनता आता चिपळुण तालुक्यातील खेरशेत या गावी विस्थापित झाली आहे.
दोन वर्षापुर्वी पावसाळ्यात एक वयोवृद्ध महिला मृत पावली. कोकणातील पाऊस सगळ्यांच्याच परिचयाचा आहे. आभाळातुन पाऊस कोसळत होता आणि सडलेल्या पत्र्यांतुन पाणी आत येत अंत्यसंस्कारावेळी वारंवार चिता विझत होती आणि ती पुन्हा पुन्हा पेटवली जात होती. आजवर येथील नागरिकांकडून स्मशानशेडवरचे सडलेले पत्रे बदलण्याची कित्येक ‘पत्र’ देवुनही संबंधीत व्यवस्थेला काडीचा फरक पडला नाही.
कोकणात शासन वेगवेगळे प्रकल्प आणु पाहतात. ज्याकरिता येथील नागरिकांनी कायमच शासनाचे ऐकले मात्र, त्यांच्या प्रमुख प्राथमिक गरजा देखील पुर्ण होत नाही हे दुर्दैव. एक गरज म्हणजे माणसाच्या मृत्युपश्चात अंत्यसंस्काराला दहा बाय पंधरा फुटाच्या चांगल्या स्मशानशेडसारख्या मागणीसाठी जर, लोकांना महाराष्ट्र दिनासारख्या आनंदाच्या दिवशी जर उपोषण करावं लागत असेल तर महाराष्ट्राचे भविष्य कठिण आहे असं म्हणावं लागेल.
सध्या महाराष्ट्रात भोंग्याच्या कर्कश आवाजाने येथील व्यवस्थेचे व वृत्तवाहिन्यांचे कानाचे पडदे फाटल्याने कदाचीत प्रकल्पग्रस्तांची आर्त किंकाळी त्यांना ऐकु येत नसेल.
महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा ….🚩