पावसाळा सुरू झाला की वेध लागतात ते पावसाळी पिकनिकचे. रिमझिम बरसलेल्या पावसामुळे अनेकांची मान्सून पिकनिकची तयारी सुपरफास्ट ट्रॅकवर आहे. कैक फुटांच्या उंचीवरून येणारे फेसाळते पाणी अंगावर घेण्याची मजा काही औरच असते. अनेकजण लोणावळा, खंडाळा, माळशेज घाट यांसारख्या गजबजलेल्या ठिकाणांना वैतागलेत त्यामुळेच जवळपासचे धबधबे शोधण्याची जोरदार धावपळ सुरू झालीये.असेच काही वेगळे हे पिकनिक स्पॉट
निवळी
निवळी घाट चढताना पर्यटकांना आकर्षित करतो तो हिरव्या दाट झाडीतून कोसळणारा धबधबा. निवळी धबधब्याचे मनोहारी दृश्य पाहण्यासाठी घाटातच पर्यटकांसाठी खास पॉइंट तयार करण्यात आला आहे. ज्या पर्यटकांना प्रत्यक्ष धबधब्याजवळ जायचे असेल त्यांच्यासाठी पायऱ्या तयार करण्यात आल्या आहेत.
सवतकडा
मुरुड-जंजिरापासून ११ किमी अंतरावरील सवतकडा धबधबा पर्यटकांनी शोधून काढला आहे. मुरुड-आगरदांडा रस्त्यावरील शिघ्रे गावातून सवतकड्याची पाऊलवाट जाते. या पाऊलवाटेवरून जाण्याचा थरार अविस्मरणीय आहे. जवळपास खाण्याची सोय नाही.
माहुली धबधबा
शहापूर तालुक्यातील माहुली धबधबा गेल्या काही वर्षांपासून पर्यटकांना आकर्षित करतोय. मुंबई मध्यरेल्वेच्या आसनगाव स्थानकापासून 5 किमी तर मुंबई-आग्रा महामार्गापासून फक्त चार किमी अंतरावर हा धबधबा आहे. मुंबई, ठाण्यापासून जवळ असल्याने पावसाळी पिकनिकसाठी हे ठिकाण म्हणजे पर्वणीच. शिवकालीन आणि ऐतिहासिक महत्त्व असलेल्या माहुली किल्ल्याचा परिसर पावसाळ्यात अधिकच विलोभनीय होतोे. उंचावरून कोसळणारे अनेक धबधबे आपली नजर खिळवून ठेवतात.
भिवपुरी
माथेरानच्या कुशीत असलेले हे ठिकाण मुंब ईपासून अगदी हाकेच्या अंतरावर आहे. भिवपुरी रेल्वे स्टेशनजवळ हॉटेल्स आहेत. गावकऱ्याना सांगितल्यास ते जेवणाची सोय करतात.
चिंचोटी
इथे पोहोचताना हिरव्या झाडाझुडपाच्या दाटीतून जावं लागतं. या मार्गावर ठिकठिकाणी धबधबे पाहायला मिळतील.मुख्य धबधब्याजवळ पोहचायला सुमारे तासभर चालावं लागतं. दहिसर टोलनाक्यानंतर ह्यकामणह्ण जंक्शनजवळ हे ठिकाण आहे. ट्रेनने जायचं असेल तर नायगाव स्टेशनला उतरून रिक्षाने जावे लागते.
तुंगारेश्वर
येथे नदी आणि धबधबा अशा दोन्ही ठिकाणचा आनंद घेता येतो. मुंबईपासून सुमारे २ तासांच्या अंतरावर तुंगारेश्वर आहे. पर्यटकांसाठी डोंगरावर कोणतीही जेवणाची व्यवस्था नाही.
रंधा फॉल
भंडारदरा हे गाव भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्यात आहे. इगतपुरी पासून तीस किलोमीटरवर. येथे भंडारदरा (विल्सन) धरण आहे. या गावाजवळ जलविद्युत केंद्र आहे. भौगोलिक अक्षांश- १९० ३१’ ४” उत्तर; रेखांश ७३० ४’ ५”पूर्व.
भंडारदरा (शेंडी) हे प्रवरा नदीच्या काठी वसलेले आहे. ते निसर्गसौंदर्याने नटलेले स्थान असून अनेक धबधबे, डोंगरकडे, जलाशय, हिरवी झाडे, शुद्ध आणि थंड हवा हे इथल्या मूळच्या सौंदर्यात अजूनच भर टाकतात.भंडारदरा धरण आणि रंधा धबधबा हे पर्यटकांचे येथील मुख्य आकर्षणाचे केंद्रबिंदू आहेतअम्ब्रेला फॉल विल्सन डॅमवरच एक मोठा गोलाकार धबधबा असून त्याच्या छत्रीसारख्या वैशिष्ट्यपूर्ण आकारामुळे त्याला ‘अम्ब्रेला फॉल’ असे म्हणतात. धरणाचे आवर्तन सुरु असताना खुप दुरवरुनही अम्ब्रेला फॉल बघता येऊ शकतो. मात्र हा अम्ब्रेला फॉल केवळ जुलै ते ऑक्टोबर महिन्यांतच पहायला मिळतो.
सह्याद्रीच्या पर्वतरांगात विल्सन डॅमपासून तयार झालेला हा धबधबा. या ठिकाणी जाण्यासाठी गाडी हा एकमेव पर्याय आहे. इगतपुरीजवळ असलेल्या विल्सन डॅमजवळ हा धबधबा आहे. या ठिकाणी जेवणासाठी हॉटेल्सची सोय नसली तरी इगतपुरीजवळ जेवणाची व्यवस्था होते.पांडवकडा
खारघर परिसरात पांडवकडा हा धबधबा गेल्या दहा वर्षांत मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईकरांच्या लीस्टमध्ये अग्रभागी आहे. या धबधब्यावर जाण्यास बंदी घातली असली तरी अनेक पर्यटक पांडवकड्याला भेट देतात. आजूबाजूच्या डोंगराने नेसलेला हिरवाकंच शालू पर्यटकांना भुरळ घालत असतो. हार्बर रेल्वे मार्गावरील खारघर स्टेशनवरून या ठिकाणी जाता येते.
पळसदरी
मुंबई-पुणे महामार्गावरच्या चौक फाट्यापासून १८ किमी दूर आणि पळसदरी रेल्वे स्टेशनपासून दोन किमी अंतरावर पळसदरी धबधबा आहे. रेल्वेमार्गाचा पर्याय असल्याने या ठिकाणी गर्दीचे प्रमाण जास्त असते. जेवणाची सोय या ठिकाणी होते.
गाढेश्वर
पनवेल तालुक्यात पावसाळी गर्दी गाढेश्वर नदीकाठी पाहायला मिळते. मनसोक्त डुंबण्यासाठी इच्छुक असणारे पर्यटक या ठिकाणी आवर्जून येतात.
फणसाड
फणसाड अभयारण्यामधील या धबधब्यात चिंब होणं म्हणजे एक रोमहर्षक अनुभव आहे. या धबधब्यात सचैल स्नानानंतर अभयारण्यात पक्ष्यांचा किलबिलाट आणि झाडांची हिरवाई पाहण्यात एक वेगळा आनंद आहे.
कोंडेश्वर
ठाणे जिल्ह्यातील बदलापूरपासून सहा किलोमीटर अंतरावर कोंडेश्वरचा धबधबा आहे. इथे दोन धबधबे आहेत. बदलापूर पूर्वेकडून भोज-दहिवली शेअर रिक्षा उपलब्ध आहेत. कुंडात डोह असून त्यात कपारी असल्याने येथे पाण्यात उतरताना पुरेशी खबरदारी घ्यावी लागते.
भगीरथ
वांगणीपासून चार किलोमीटर अंतरावर पर्यटकांचे प्रमुख आकर्षण ठरलेला भगीरथ धबधबा आहे. बेडीसगावापासून धबधब्याकडे जाण्यासाठी पायवाट आहे. या ठिकाणी जेवणाची सोय नाही.
टपालवाडी
नेरळ रेल्वे स्थानकापासून तीन किलोमीटर अंतरावर असणार्या आनंदवाडी आदिवासी वाडीजवळ यथेच्छ पोहण्यासाठी छान डोह असणारा एक धबधबा आहे. अलीकडच्या काळात पर्यटकांपैकीच कुणीतरी ह्यटपालवाडीचा धबधबाह्ण असे त्याचे नाव ठेवले आहे. ठिकाण अतिशय निसर्गरम्य असले तरी येथे जेवण तसेच कोणतेही खाद्यपदार्थ मिळण्याची व्यवस्था नाही.
आषाणे
भिवपुरी-कर्जतदरम्यान भिवपुरीपासून पाच किमीवर असलेल्या आषाणे गावाजवळील धबधबा हेही पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे. इथे जाण्यासाठी भिवपुरीपासून रिक्षा मिळते. आषाणे ग्रामस्थ पर्यटकांना मागणीनुसार जेवण करून देतात.
थिदबीचा धबधबा
पावसाळ्यात माळशेज घाटाकडे जाताना दूर डावीकडे डोंगरात खूप उंचावरून कोसळणारा धबधबा आपल्याला दिसतो. कल्याण-माळशेज रस्त्यावर घाटाच्या पायथ्याशी साबर्णे गावापासून पुढे थिदबी गावापर्यंत ३ कि.मी. कच्च्या रस्त्याने चालत जावे लागेल.
ताम्हिणी घाट
लोणावळ्याजवळील कार्ला-भाजे लेण्या, लोहगड,विसापूर, राजमाची, तुंग,तिकोन्याच्या वाटेने पुढे पौडमार्गे मुळशी धरणाला रस्ता जातो, तोच रस्ता खाली कोंकणात माणगाव-कोलाडला उतरतो. हाच तो ताम्हिणी घाट. मुळशी धरणाच्या काठाकाठाने जाणारा हा गाडी रस्ता अतिशय सुंदर असून एकीकडे धरणाचा पाणवठा आणि त्याचबरोबर उंच डोंगर आणि खोल दर्याचा देखावा एक अविस्मरणीय आनंद देतो.
जव्हार
ठाणे जिल्ह्यातील जव्हार म्हणजे डोंगरदऱ्या असंख्य धबधबे, दूरवर पसरलेली भातशेती, यांनी नटलेले छोटेसे हिल स्टेशन. इथला हनुमान टेकडी, शिर्पा माळ, दाभोसा धबधबा ठिकाण पाहण्यासारखा आहे. कसारा घाटाअलीकडे बळवंतगड हा छोटासा किल्लादेखील पाहण्यासारखा आहे. नाशिक त्र्यंबकेश्वर परिसरात असणारे कावनई, गडगडा, त्रिंगलवाडी, हरिहर, बसगड, अंजनेरी इत्यादीसारख्या बर्याच किल्ल्यांची सैर पावसात करता येते.
तानसा आणि भातसा
ठाणे-नाशिक महामार्गावर आटगावहून तानसा आणि याच भातसा धारणाकडे जाणारा रस्ता आहे. इथेदेखील एक दिवसीय पावसाळी सहलीला जाता येईल.
कळसूबाई
कळसुबाई, भंडारदरा आणि रंध धबधब्याला पावसाळ्यात भेट द्या. इथले अमृतेश्वर मंदिर आवर्जून पाहण्यासारखं आहे. साम्रद गावाजवळील सांधण दरी अप्रतिम आहे. रतनगड किल्लादेखील याच परिसरात असून अनेक मंडळी रतनगड ते हरिश्चंद्रगड असा ट्रेकदेखील करतात.
तोरणमाळ
धुळे-नंदुरबार इथून जवळ असलेल्या तोरणमाळ या ठिकाणची सुंदरता काही औरच आहे.इथले जंगल, डोंगरदऱ्या, पक्षी, रंगीबेरंगी फुले आपले मन प्रसन्न करून टाकतील यात वादच नाही.
चिखलदरा
हे अमरावतीहून जवळ असणारे आणि विदर्भवासीयांचे आवडते ठिकाण. इथे असणारा गाविलगड किल्ला, किचकदरा यासारखी बरीच ठिकाणं पाहण्यासारखी आहेत.चिखलदर्याहून जवळच्या मेळघाट व्याघ्रप्रकल्पाला नक्की भेट द्या.
कासचे पठार
सातारा जिल्ह्यातलं कासचे पठार म्हणजे महाराष्ट्रातील व्हॅली ऑफ फ्लॉवर्स. साधारण सप्टेंबर महिन्यात या पठारावर असंख्य विविधरंगी फुले फुलतात आणि त्याचा आनंद घेण्यासाठी हजारो पर्यटक इथे भेट देतात. कासबरोबरच साताऱ्या जवळ नदीकिनारी आणि जुन्या मंदिरांचा समूह असणाऱ्या माहुली तसेच अजिंक्यतारा, सज्जनगड, ठोसेघर धबधबा पाहण्यासारखा आहे. सातारहून ८ कि.मी. असलेल्या कण्हेर धरणाला सुद्धा भेट देता येईल.
पन्हाळगड ते विशाळगड
ट्रेकर्सनी पन्हाळगड ते विशाळगड हा पावसाळी ट्रेक नक्की करावा. मसाईचे विस्तीर्ण पठार, शेती, जंगल, ओढे, नदी, नाले, छोटी छोटी गावे अशा ठिकाणांहून हा ट्रेक पूर्ण होतो.
वरंधाघाट
पुण्याहून भोरमार्गे महाडला जाणाऱ्या वाटेवर वरंधाघाट लागतो. वरंधाघाटा लगतच कावळ्या या किल्ल्यावर जाता येईल. डोंगरातून वाहणारे छोटे मोठे झरे, धबधबे, बाजूला खोल दरी आणि त्या दरीत दिसणारं छोटंसं गाव, आणि त्या गावालगत वाहणारी नदी असे वेड लावणारं सौंदर्य वरंधाघाटात आहे. वरंधाघाट उतरल्यावर शिवथरघळ इथली गुहा आणि त्या गुहेबाहेर पडणारा पाऊस, धबधबा म्हणजे क्या बात!
सुरगड किल्ला
रायगड जिल्ह्यातील नागोठणेजवळील सुकेळी खिंडीजवळ खांबगाव नजीक सुरगड किल्ल्याला देखील भेट देणं छान वाटेल. मुंबईहून महाडकडे जाताना याच सुकेळी खिंडीपासून पायवाटेने साधारण २० मिनिटांनंतर एक उंच धबधबा दिसतो. त्या धबधब्याचं पाणी आणि नदी हे एक अतिशय सुंदर आणि सुरक्षित ठिकाण आहे.