एकाच इमारतीचे दोनदा उद्घाटन! पांगरीत श्रेयवादाचा कळस; दोन तासांत दोन लोकप्रतिनिधींची रिबनबाजी
संगमेश्वर : राजकारणातील श्रेयवाद आणि मानापमानाचे राजकारण कोणत्या टोकाला जाऊ शकते, याचा प्रत्यय रविवारी पांगरी गावात आला. नूतन ग्रामपंचायत इमारतीचे अवघ्या दोन तासांच्या अंतराने दोन वेळा उद्घाटन झाल्याने तालुकाभर आश्चर्य व्यक्त होत आहे. सकाळी सुमारे ११ वाजता जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते शासकीय पद्धतीने फीत कापून आणि नारळ फोडून ग्रामपंचायत इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. मात्र, त्यानंतर अवघ्या दोन तासांनी दुपारी १ वाजता चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघाचे आमदार शेखर निकम समर्थकांसह पांगरी येथे दाखल झाले आणि त्याच इमारतीचे पुन्हा उद्घाटन केले.
एकाच सरकारी इमारतीचे दोन वेळा उद्घाटन झाल्याने हा प्रकार तालुक्यात चर्चेचा विषय ठरला आहे. राजकीय श्रेयासाठी सुरू असलेल्या स्पर्धेचे हे ज्वलंत उदाहरण असल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे. “ही इमारत कोणत्याही नेत्याच्या वैयक्तिक निधीतून उभी राहिलेली नाही. जनतेच्या कराच्या पैशातून उभारलेल्या इमारतीच्या उद्घाटनावरून राजकीय शक्तिप्रदर्शन करण्याची गरज काय?” असा सवाल अनेक नागरिक उपस्थित करत आहेत. या घटनेमुळे पालकमंत्री आणि स्थानिक आमदार यांच्यातील राजकीय मतभेद पुन्हा एकदा उघड झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. “सकाळी एक उद्घाटन, दुपारी दुसरे उद्घाटन” असा दुर्मीळ प्रकार घडल्याने पांगरीतील ग्रामपंचायत इमारत विकासापेक्षा श्रेयवादाच्या राजकारणामुळे अधिक चर्चेत आली आहे.















