दरवर्षी पावसाळ्यात विविध रानभाज्या आपल्या आसपास उगवलेल्या आढळून येतात. या भाज्या चवीला रुचकर असतातच; तसेच त्या पौष्टिक आणि औषधीसुद्धा असतात. अशाच काही रानभाज्यांची माहिती आज आपण पाहू
टाकळा :
– ही वनस्पती पावसाळ्यात उगवते व ऑक्टोवर ते डिसेंबर या कालावधीत तिला फुले येतात.
– टाकळा ह्या वनस्पतीला उग्र वास किंवा दुर्गंधी असला तरी टाकळ्याच्या कोवळ्या पानांची भाजी करतात.
– टाकळ्याच्या पानांची भाजी सर्व प्रकारच्या त्वचारोगात देतात तर त्याच्या बिया वाटून लेप त्वचेवर लावतात.
– तसेच भाजी गुणाने उष्ण असल्याने शरीरातील वात व कफदोष कमी होण्यास मदत होते.
आंबुशी :
– पावसाळ्यात रस्त्याच्या कडेला आंबुशी ही नाजूक वनस्पती उगवलेली पाहावयास मिळते.
– ही महाराष्ट्रात सर्वत्र आढळते.
– आंबुशी गुणाने रूक्ष व उष्ण आहे. ही वनस्पती पचनास हलकी असून, भूक वाढीसाठी उपयुक्त आहे
– तसेच कफ, वात आणि मूळव्याध यात आंबुशी गुणकारी आहे
मायाळू :
– मायाळू ही बहुवर्षायू वेल असून, या वनस्पतीची बागेत, अंगणात, परसात तसेच कुंडीत लागवड करतात.
– मायाळूचे वेल कोेकणात सर्वत्र आढळतात.
– मायाळूची कोवळी पाने भाजीसाठी वापरतात.
– रक्ताची किंवा पित्ताची उष्णता अतिशय वाढल्यास मायाळूची भाजी देतात.
– गुणधर्माने ही भाजी थंड स्वरूपाची आहे.
– मायाळूची भाजी पालकाप्रमाणे जिरण्यास हलकी आहे.
करटोली :
– करटोलीची वेल कोकण, मराठवाडा, विदर्भ, पश्चिम घाट व पश्चिम महाराष्ट्र परिसरात आढळतात.
– करटोलीला जून ते ऑगस्ट महिन्यात फुले व त्यानंतर फळे तयार होतात.
– करटोलीच्या फळांची भाजी कारल्यासारखीच असून, पावसाळ्याच्या अखेरीस ही भाजी बाजारात काही ठिकाणी येते.
– करटोली हे डोकेदुखीवरील उत्तम औषध आहे. तसेच मधुमेहाच्या रुग्णांनी या भाजीचे नियमित सेवन केल्यास रक्तातील साखर कमी होते.
कपाळफोडी :
– ही वेलवर्गीय वनस्पती असून, पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात आढळते.
– या वनस्पतीची वेल महाराष्ट्रातील जंगले, शेत आणि ग्रामीण भागात आढळते.
– सांधेसुजीवर पंचांग पाण्यात किंवा दुधात वाटतात व लेप करतात. यामुळे ठणका कमी होतो व सूज उतरते.
– कानदुखीत तसेच कानफुटीत कानात घालतात. यामुळे कानदुखी थांबते म्हणूनच या वनस्पतीला कानफुटी असेही नाव आहे.
शेवळा :
– शेवळा ही वर्षायू, कंदवर्गीय वनस्पती आहे.
– महाराष्ट्रामध्ये शेवळा वनस्पती कोकण, पश्चिम महाराष्ट्र व अकोला येथील जंगलात आढळते.
– शेवळ्याचा कंद औषधात वापरतात. याच्या कंदाची पाने दूध आणि साखरेबरोबर वाजीकरणासाठी देतात.
– शेवळ्याचे कंद व कोवळी पाने भाजीसाठी वापरतात.
मोरशेंड :
– ही वर्षायू रोपवर्गीय वनस्पती पावसाळ्यात सर्वत्र आढळते.
– शेतात, जंगल परिसरात, रस्त्यांच्या कडेने, ओसाड पडीक जमिनीवर, गावांत, गावाबाहेर सर्वत्र वाढलेली आढळते.
– मोरशेंड वनस्पतीच्या कोवळ्या पानांची भाजी करतात.
– या भाजीच्या सेवनामुळे रक्तातील युरिक ऍसिडचे प्रमाण कमी होऊन सांध्यांची सूज कमी होते.
नळीची भाजी :
– नळीची भाजी ही वनस्पती तळी व तलावांच्या शेजारी, काठांवर, पाणथळ, ओलसर जमिनीवर, दलदलीच्या ठिकाणी वाढलेली आढळते.
– महाराष्ट्रात ही वनस्पती सर्वत्र आढळते. या वनस्पतीचे वेल जमिनीवर पसरत वाढतात.
– नागिणीच्या उपचारात ही वनस्पती वापरली जाते. तसेच कावीळ, श्वासनलिका दाह व यकृतविकारात या वनस्पतीचा वापर करतात.
आघाडा :
– आघाडा ही वर्षायू रोपवर्गीय वनस्पती असून, पावसाळ्यात जंगलात, ओसाड, पडीक जमिनीवर, रस्त्यांच्या कडेने, शेतात सर्वत्र आढळते.
– प्रामुख्याने उष्ण कटिबंधीय प्रदेशात भारतात, महाराष्ट्रात सर्वत्र ही वनस्पती आढळते.
– या वनस्पतीची मुळे, पाने, फुले, फळे (पंचांग) औषधात वापरतात.
– अंगातील जास्त चरबी कमी होण्यासाठी आघाड्याच्या बिया उपयुक्त आहेत.
– जेवण्यापूर्वी आघाड्याचा काढा दिल्यास पाचक रस वाढतो, तर जेवणानंतर दिल्यास आम्लता कमी होते.
– रातांधळेपणात आघाड्याच्या मुळाचे चूर्ण देतात.
भुईआवळी :
– भुईआवळी ही वर्षायू रोपवर्गीय वनस्पती असून, 20 ते 50 सें.मी.पर्यंत उंच वाढते.
– भुईआवळी ही वनस्पती “इफोरबिऐसी’ कुळातील म्हणजेच एरंडाच्या कुळातील आहे.
– याची पाने, कोवळी खोडे व फांद्या भाजी करण्यासाठी वापरतात.
– फ्ल्यूसारख्या थंडी-तापाच्या आजारात, तसेच वरचेवर सर्दी-खोकला, ताप येणे अशा लक्षणांत ही भाजी नियमितपणे खावी.