देवरूख – लोकशाही व्यवस्थेत पत्रकार हे प्रशासन आणि जनता यांच्यातील महत्त्वाचा दुवा मानले जातात. शासनाचे निर्णय, विकासकामे, लोकहिताच्या योजना आणि जनप्रतिनिधींची भूमिका जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम पत्रकार सातत्याने करत असतात. मात्र, संगमेश्वर पंचायत समितीच्या मासिक सभेत पत्रकारांनाच प्रवेश नाकारण्यात आल्याने तालुकाभर संतापाची भावना निर्माण झाली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील बहुतांश पंचायत समित्या तसेच जिल्हा परिषदेच्या बैठकींमध्ये पत्रकारांना उपस्थित राहून वृत्तांकन करण्याची परवानगी असताना, केवळ संगमेश्वरमध्येच असा वेगळा नियम का लागू करण्यात आला आहे, असा सवाल पत्रकारांसह सर्वसामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. लोकशाहीत निर्णय प्रक्रिया जितकी खुली असेल तितका जनतेचा विश्वास अधिक दृढ होतो. मात्र, पत्रकारांनाच दूर ठेवले जात असल्याने सभागृहात नेमके काय घडते, कोणते निर्णय घेतले जातात, निधीचा वापर कुठे आणि कसा होतो, विकासकामांचा आढावा काय असतो, याबाबत जनतेमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. पत्रकारांना प्रवेश नाकारण्यामागे नेमके कारण काय, याचे स्पष्ट उत्तर प्रशासनाकडून अद्याप देण्यात आलेले नाही. त्यामुळे “सभागृहात असे काय घडते आहे की ते जनतेपर्यंत पोहोचू नये?” असा प्रश्न आता अधिक तीव्रतेने विचारला जाऊ लागला आहे.















