बातम्या शेअर करा

सण आयलाय गो आयलाय गो नारळी पुनवेचा

मनी आनंद मावेना कोळ्यांच्या दुनियेचा

कोरोना आपत्तीत बंद असलेला मत्स्यव्यवसाय, सततचा मत्स्यदुष्काळ व नुकतेच झालेले निसर्ग चक्रीवादळ आदींच्या महाआपत्तीने आर्थिक खाईत लोटलेला, होरपळलेला कोळी बांधव सागरकिनाऱ्याला भाग्याचा संदेश घेऊन आलेल्या नारळी पौर्णिमेच्या साक्षीने आज सागराला श्रीफळ अर्पण करुन दर्यावर राज्य करण्यासाठी सज्ज झाला आहे. यानिमित्ताने समस्त दर्याच्या राजाला एक नवसंजीवनी प्राप्त होणार असून आज त्याच्या आनंदाला उधाण येणार आहे.

नारळीपौर्णिमा हा कोळीबांधवांचा पवित्र उत्सव. संसाराचा गाडा ज्याच्या साक्षीने चालतो असा हा रत्नाकरच आपले जीवन आहे आणि त्याच्यावरच आपला मासेमारी व्यवसाय पिढ्यानपिढ्या सुरु असल्याचे आजही त्यांच्याकडून मानले जाते. सागराचे आमच्यावर खूप उपकार आहेत, असे आजही कोळीबांधव अभिमानाने सांगतात. अलिकडच्या काही वर्षात कोकण किनारपट्टीवरचा कोळीबांधव आपल्या मत्स्य व्यवसायात होरपळताना दिसत आहे. सातत्याने त्याच्यावर आपत्ती कोसळत आहे. विशेष करुन 2006 च्या फयान वादळापासून कोळीबांधवांच्या मागे एकप्रकारे निसर्गदृष्टच लागली आहे. फयानमध्ये उध्दवस्त झालेला कोळीबांधव कसाबसा पुन्हा उभा राहिला आणि पुढील येणाऱ्या संकटांना सामोरे जाण्यासाठी सज्जही झाला. पर्ससीन व एलईडीद्वारे होणारी बेसुमार मासेमारी त्यामुळे मत्स्यजीवांवर होणारा परिणाम व मत्स्यदुष्काळ या खाईत कोळीबांधव लोटला गेला. आजही हा संघर्ष सुरुच आहे.

कोळीबांधवांच्या मागे अशी शुक्लकाष्ठ सुरु असतानाच आता कोरोना रोगासारखी आपत्ती डोंगरासारखी उभी आहे. गेले पाच महिने लाँकडाऊन असल्याने पूर्णतः  मासेमारी व्यवसाय ठप्प झाला. मासेमारीचा मुख्य हंगामच वाया गेला. मासळीची निर्यात थांबली. लहान-मोठ्या मच्छिमारांच्या मासळी विक्री व्यवसायावरही गदा आली. यानंतर पावसाळा सुरु झाला आणि शासनाच्या नियमानुसार मासेमारी दोन महिने बंद करावी लागली. त्यातच जून महिन्यात निसर्ग चक्रीवादळ येऊन धडकले. यामध्ये सागरी किनारी राहणारा कोळीबांधव पुरता उध्वस्त झाला. घरांची पडझड, मासेमारी नौकांचे नुकसान, मासळी सुकविण्याचे ओटे, वस्तीला समुद्र उधाणाचा धोका पोहचू नये म्हणून उभारण्यात आलेले धूपप्रतिबंधक बंधारे आदींची या चक्रीवादळात हानी झाली. संपूर्ण हे वर्षच कोळीबांधवांना दुष्काळाच्या खाईत लोटणारे ठरले. शासनाची नुकसानभरपाई मिळाली तरी ती नेहमीसारखी तुटपुंजीच. कोणाचेही सहकार्य नाही. जमीन नाही की इतर मालमत्ता नाही. कोळीबांधव आजही सागराशी झुंजत आपला पारंपरिक मासेमारी व्यवसाय करीत आपला उदरनिर्वाह करताना दिसत आहे.

इथे मासळीला गिऱ्हाईक सारे, सागरी झुंजणारा कोण कोळी आहे

खेळी सत्याची रे मी सदा हरलो, किनारा गाठायला कुठे होडी आहे

मासळी खरेदीला खूप गिऱ्हाईक असतात मात्र, सागरातून कोण मासळी आणतो, त्याचे नाव काय, सागरातून मासळी होडीपर्यंत घेऊन येईनपर्यंत किनारा गाठायला किती श्रम घ्यावे लागतात, हे कुणालाच ठाऊक नाही. अशा या कोळीबांधवांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत. आज नारळीपौर्णिमेच्या या पवित्र सणाला आर्थिक खाईत लोटलेल्या कोळीबांधवांच्या जीवनाला एक वेगळी उभारी लाभणार आहे. या सर्व आपत्तींवर मात करुन कोळीबांधव आज दर्यावर राज्य करण्यासाठी सज्ज झाला असून पुढील काळ हा त्यांच्या सर्वांगीण सुखासाठी, त्यांच्या आर्थिक भरभराटीचा व त्यांना उत्तम दीर्घायुष्य लाभण्याचा नक्की ठरेल, अशी अपेक्षा यानिमित्ताने व्यक्त होत.

सागरीकिनारी कल्पवृक्षाच्या फळाला फार मोठी प्रतिष्ठा आहे. समुद्रकिनाऱ्यावर राहणाऱ्यांचा हा अत्यंत आवडीचा नि निवडीचा हा कल्पवृक्ष आहे. तोच त्यांचा अन्नदाता व प्राणदाता आहे. आपल्या कोणातील विस्तीर्ण समुद्रकिनारपट्टी भागात नारळ हे एक महत्वाचे उत्पन्न आहे. नारळीपौर्णिमेला कोकणात अजूनही नारळ लढविण्याचा खेळ तरुण मंडळी खेळताना दिसतात. दोन खेळाडूंनी हातात नारळ घेऊन तो दुसऱ्याच्या हातातील नारळांवर आपटून फोडण्याचा हा खेळ फारच लक्षवेधी असतो. त्याचा नारळ फुटेल त्याने आपला फुटलेला नारळ प्रतिस्पर्ध्याला देऊन टाकायचा अशी पध्दत असते. हा खेळ खेळण्याचे कौशल्य असलेल्यांची संख्या कमी झाल्याने आजकाल हा खेळ फारसा पहावयास मिळत नाही.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here