मार्गताम्हाने – मोठी बाजारपेठ, सर्वप्रकारची शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये, रुग्णालये असा भरगच्च गोतावळा लाभलेल्या चिपळूण-गुहागर मार्गावरील मार्गताम्हाने गावच्या दोनही बाजूने असणाऱ्या देवघर व उमरोली सीमांवर कोरोना येऊन ठेपल्याने मार्गताम्हाने गाव सतर्क झालेले आहे. या पार्श्वभूमीवर नुकतीच ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांची बैठक झाली. याबाबतची माहिती ग्रामस्थ संदीप चव्हाण यांनी दिली.
मार्गताम्हाने गाव हे सुमारे 20 गावांचे बाजारपेठ असलेले ठिकाण. सर्वप्रकारची दुकाने, रुग्णालये, सरकारी कार्यालये येथे असल्याने या बाजारपेठेत नेहमीचच वर्दळ असते. कोरोना प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर लाँकडाऊन काळात गेले चार महिने येथे स्थानिक प्रशासनाकडून उपाययोजना व शासनाच्या कडक नियमांचे पालन करण्यात आले होते. वारंवार आर्थिक व्यवहार येथे ठप्प होते. मात्र, जसजसे लाँकडाऊनचे दिवस वाढले जात असल्याने, नियमांची बंधने शिथील होत असल्याने व गावाला कोरोना आपत्तीचा कोणताही धोका नसल्याने निर्धास्त झालेल्या येथील लहान-मोठ्या व्यापाऱ्यांनी आपले सर्वप्रकारची दुकाने उघडून व्यवहार सुरुळीत केले होते. स्थानिक प्रशासनाने कडक नियमांच्या अंमलबजावणीसाठी येथे बरेच प्रयत्नही केले होते. मात्र, बाजारपेठ ग्राहकांसाठी सताड उघडी ठेवल्याने कुणीही यावे आणि गावात फिरावे अशी स्थिती येथे आढळून आल्याने गावाच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न उभा राहिला होता.
आजपर्यंत मार्गताम्हाने गावाला कोरोना आपत्तीचा धोका पोहचलेला नसला तरी गावच्या उंबरठ्यावर कोरोना येऊन ठेपलेला असल्याने स्थानिक प्रशासन खडबडून जागे झाले आहे. मार्गताम्हाने गाव चिपळूण-गुहागरच्या मध्यवर्ती आहे. चिपळूण तालुक्यातील उमरोलीच्या सीमेपासून सुरु होणाऱ्या या गावाची हद्द गुहागर तालुक्याच्या देवघर सीमेवर संपते. येथूनच गुहागर तालुका सुरु होतो. त्यामुळे व्यापारी केंद्र व वर्दळीचा गाव असलेल्या मार्गताम्हानेला धोका पोहचण्याची शक्यता आहे.
दरम्यान, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मार्गताम्हाने बुद्रुक ग्रामपंचायत व ग्रामस्थांची शुक्रवार दि. 31 जुलै रोजी बैठक झाली. यामध्ये विविध उपाययोजना राबविण्याचे ठरविण्यात आले. यात बाजारपेठेतील वेळांची नियमावली स्पष्ट करण्यात आली. परिसरातील गावांतील नागरिक, ग्राहक यांची गर्दी होऊ नये तसेच गणपतीला आलेल्या मार्गताम्हानेसह सर्व गावांतील चाकरमान्यांनी बाजारपेठेत विनाकारण फिरु नये, येऊ नये अशा पध्दतीचा पत्रव्यवहार सर्व गावांना केला आहे. घरे बंद असणाऱ्या गावातील चाकरमान्यांनी घरातच रहावे, ज्या घरी चाकरमानी येणार आहेत त्यांनी 7 दिवस बाहेर क्वारंटाईन व्हावे, तसेच गणपतीत काढण्यात येणाऱ्या आगमनाच्या व विसर्जनाच्या मिरवणुका, नाच, सत्यनारायण पूजा आदी कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आल्याचे ठरविण्यात आलेले आहे. हा उत्सव सोशल डीस्टींग पाळून आनंदाने साजरा करावा, असे आवाहनही स्थानिक प्रशासनाने केलेले आहे.
