गुहागर – गुहागर-चिपळूण मार्गावरील अनेक पेट्रोल पंपांवर पेट्रोल आणि डिझेलची टंचाई निर्माण झाल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी इंधन उपलब्ध नसल्याने वाहनचालकांची मोठी गैरसोय होत असून, पंपांवर वाहनांच्या रांगा लागल्याचे दिसून येत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानंतर नागरिकांमध्ये इंधन साठवण्याची घाई वाढल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे अनेक वाहनचालकांनी पेट्रोल पंपांकडे धाव घेतल्याने अचानक मागणी वाढली असल्याचे बोलले जात आहे. मात्र, नेमके पेट्रोल-डिझेल का संपत आहे, याबाबत अद्याप अधिकृत स्पष्टीकरण समोर आलेले नाही. खरोखरच इंधनाचा पुरवठा कमी झाला आहे का, की काही ठिकाणी कृत्रिम टंचाई निर्माण केली जात आहे, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. कोकणात आलेले कोकणवासीय आणि पर्यटक यांची मात्र तारांबळ उडताना दिसत आहे.
दरम्यान, इंधनाअभावी सर्वसामान्य नागरिक, प्रवासी तसेच व्यावसायिक वाहनधारकांचे हाल होत आहेत. प्रशासनाने याबाबत तातडीने स्पष्ट भूमिका घेऊन नागरिकांमधील संभ्रम दूर करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
















