गुहागर- गुहागर तालुक्यात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये युती आणि आघाड्यांची समीकरणे जुळून न आल्याने या निवडणुका पक्षीय लाटेपेक्षा पूर्णपणे व्यक्ती केंद्रित ठरण्याची चिन्हे दिसत आहेत. सध्याच्या राजकीय हालचाली पाहता निकाल धक्कादायक लागण्याची शक्यता असल्याचे मत राजकीय जाणकारांनी व्यक्त केले आहे.
गुहागर तालुक्यातील मतदारांचा स्वभाव पाहता, केवळ पक्षाचे नाव, झेंडा किंवा मोठ्या नेत्यांची भाषणे यावर निर्णय घेतला जात नाही. उलट, ‘हा उमेदवार आपल्या गावासाठी काय करतो? अडचणीच्या वेळी तो उपलब्ध असतो का? पाणी, रस्ते, पूरस्थिती, रोजगार तसेच आदिवासी व डोंगराळ भागातील प्रश्नांवर त्याची भूमिका काय होती?’ अशा प्रश्नांची उत्तरे मतदार स्वतः शोधत आहेत. त्यामुळे मोठ्या पक्षाचा उमेदवार असला तरी स्थानिक पातळीवर विश्वास निर्माण करण्यात तो अपयशी ठरला, तर मतदार त्याला सहज नाकारू शकतात. याची प्रचिती नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत आली आहे. गुहागर तालुक्यातील राजकारण हे अत्यंत स्थानिक समीकरणांवर आधारित आहे. अनेक ठिकाणी एकाच पक्षातील जुने वैयक्तिक वाद, विकासकामांवरील नाराजी किंवा काही भागांचे दुर्लक्ष यामुळे मतदार पक्ष न पाहता थेट व्यक्तीला मतदान करतात. याच कारणामुळे क्रॉस वोटिंगचे प्रमाण वाढण्याची दाट शक्यता आहे.
यंदा तालुक्यात बहुतांश ठिकाणी तिरंगी लढती होण्याची शक्यता आहे. या तिरंगी लढतीत कोणत्या पक्षाचा पराभव करायचा आणि कोणत्या नेत्याला निवडून द्यायचे, या मानसिकतेत मतदार दिसून येत आहेत. त्यामुळे नवखे उमेदवार प्रस्थापित उमेदवारांना कडवी झुंज देतील, हे निश्चित मानले जात आहे. या पार्श्वभूमीवर भाजप, दोन्ही शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी तसेच अपक्ष उमेदवार केवळ पक्ष संघटनेच्या बळावर विजय मिळवू शकणार नाहीत. स्थानिक स्वीकार्यता, स्वच्छ वैयक्तिक प्रतिमा, विकासकामांची पावती आणि जनतेशी थेट जोडलेली नाळ असलेला उमेदवारच निर्णायक बाजी मारू शकतो. एकूणच, गुहागर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये पक्षापेक्षा उमेदवाराची व्यक्तिसापेक्ष कसोटी लागणार असून, त्यावरच अंतिम निकालाची भिस्त राहणार असल्याचे मत राजकीय जाणकार व्यक्त करीत आहेत.



















