वाई – सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील नावेची वाडी येथील रहिवासी आणि प्रगती टाइम्सचे प्रतिनिधी पत्रकार प्रविण गाडे यांचे वडील विठ्ठल अंतू गाडे (वय ७३) यांचे शनिवार, दि. २ मे रोजी रात्री अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत करण्यात येत आहे.
विठ्ठल अंतू गाडे यांच्या या अकस्मित जाण्याने सात्विक, कष्टाळू आणि परोपकारी व्यक्तिमत्वाला समाज मुकला आहे. विठ्ठल गाडे यांनी आपले संपूर्ण आयुष्य साधेपणा, प्रामाणिकपणा आणि परोपकाराच्या मार्गाने व्यतीत केले. कोणाशीही वाद न ठेवता सर्वांशी जिव्हाळ्याने वागणारे त्यांचे व्यक्तिमत्त्व सर्वांना भावलेले होते. वारकरी संप्रदायाची परंपरा जपत पांडुरंगावरील त्यांची अढळ श्रद्धा आणि भजन-कीर्तनाची आवड ही त्यांच्या जीवनाची ओळख बनली होती.
प्रवीण गाडे यांचे वडील हे वारकरी संप्रदायाशी निष्ठेने जोडलेले होते. त्यांनी आयुष्यभर भक्ती, समाजसेवा आणि आध्यात्मिक कार्यात मोठे योगदान दिले. वारकरी परंपरेचा प्रसार, कीर्तन-भजन आणि सामाजिक एकोपा वाढविण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले होते.
व्यवसायाने गवंडी असलेल्या विठ्ठल गाडे यांनी आपल्या कष्टाच्या जोरावर अनेकांची स्वप्नातील घरे उभी केली. मात्र, स्वतःच्या घराचे बांधकाम सुरू असतानाच काळाने त्यांना हिरावून नेले. अर्धवट राहिलेले ते स्वप्न आज कुटुंबीयांसाठी वेदनादायी ठरत आहे. रविवार, दि. ३ मे रोजी सकाळी वाई येथील रविवार पेठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, सून, दोन विवाहित मुली आणि सहा नातवंडे असा मोठा परिवार आहे.
स्व. विठ्ठल गाडे यांचा सावडण्याचा विधी सोमवार, दि. ४ मे २०२६ रोजी सकाळी ८:३० वाजता रविवार पेठ, वाई येथील स्मशानभूमीत होणार असल्याची माहिती गाडे परिवाराच्या वतीने देण्यात आली आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो आणि गाडे कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो, हीच प्रार्थना.
















