आंबा घाट दरोडा प्रकरण ; पाच आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश

0
207
बातम्या शेअर करा

साखरपा – रत्नागिरी कोल्हापूर या मार्गावरील आंबा घाट येथे ८ एप्रिल रोजी रात्री घडलेल्या दरोड्याच्या घटनेत आठपैकी पाच आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. देवरूख पोलीस ठाणे यांनी तातडीने कारवाई करत आरोपींना जेरबंद केले.

प्रथमेश तानाजी दळवी (रा. शाहूवाडी, कोल्हापूर) हे आपल्या बोलेरो गाडीतून वेतोशी (ता. रत्नागिरी) येथून सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास एक म्हैस घेऊन शिराळा (सांगली) येथे निघाले होते. आंबा घाटातील दख्खन परिसरात पोहोचल्यावर थार (एमएच ०८-२७६७) आणि इनोव्हा (एमएच ०८-२०९९) या वाहनांमधून आलेल्या आठ अज्ञात व्यक्तींनी त्यांची गाडी अडवली. आरोपींनी दळवी यांना गाडीतून खाली उतरवून मारहाण केली व चाकूचा धाक दाखवत त्यांना जबरदस्तीने इनोव्हा गाडीत बसवून साखरपा येथील पेट्रोल पंपावर नेले. तेथे त्यांना दमदाटी करत ५० हजार रुपयांची मागणी केली आणि गाडीतील २५ हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. तसेच पोलिसांत तक्रार केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.
या घटनेची तक्रार दाखल होताच पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला. जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे व अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम आणि पोलीस निरीक्षक उदय झावरे यांनी विशेष पथक तयार करून तपास गतीमान केला. तपासादरम्यान फरहान रशिद मुल्ला , प्रथमेश सचिन भाटकर , सर्वेश सुभाष कीर , धर्मलिंगम विजयकुमार नाडर आणि भूषण बिपेंद्र सावंत या पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. उर्वरित आरोपींचा शोध सुरू असून, पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here