मुंबई- अजित पवारांचा विमान अपघात की घातपात? असा प्रश्न अनेकांना पडला असताना आता त्यांचे पुतणे आमदार रोहित पवार यांनी अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. दादांचा प्लॅन हा कारने जाण्याचा होता, पण आदल्या रात्री, काही कारणं काढून त्यांचा वेळ मुंबईत कसा जाईल, आणि दुसऱ्या दिवशी घाईगडबीत अजितदादा विमानाने जातील असं नियोजन करण्यात आलं होतं का? विमानाचे दोन्ही पायलट हे ऐनवेळी का बदलण्यात आले? असे प्रश्न रोहित पवारांनी विचारले. व्हीएसआर कंपनीच्या विमानाला मेंटेनन्स सर्टिफिकेट कुणी दिलं, त्याचा अहवाल समोर का येत नाही असा प्रश्नही रोहित पवारांनी विचारला.
कारने प्रवास करणारे अजितदादा हे विमानानेच कसे जातील यासाठी काही जणांनी प्रयत्न केले का याचा तपास करावा अशी मागणी रोहित पवारांनी केली. विमानाचा अपघात होताना पायलटने मेडे कॉल का दिला नाही? विमानाचा ट्रान्सपाँडर का बंद केला होता? पायलटला विमानाचा अपघातच घडवायचा होता का? असे अनेक प्रश्न रोहित पवारांनी विचारले. दादांच्या अपघाताची चौकशी ही इथल्या संस्थेने करावाच, पण त्याचसोबत फ्रान्स किंवा अमेरिकेच्या तपास संस्थेनेही करावा अशी मागणी रोहित पवारांनी केली. अजित पवार यांचा अपघात हा घातपात आहे का? हा सर्वात मोठा प्रश्न आहे. मलाही याबाबत शंका आहे. कारण कदाचित ही घटना घातपात असू शकते, असा थेट दावा रोहित पवार यांनी केला.अजितदादांसोबत घातपात झाला का? हे शोधण्यासाठी खोलात जावे लागेल. कारण महाराष्ट्रातील एक मोठा नेता गेला आहे. ही घटना हलक्यात घेऊन चालणार नाही, अशी भूमिका घेत अजित पवार यांच्या अपघाताची चौकशी करायला हवी, अशी मागणी त्यांनी केली. रोहित पवार यांनी दावा केला की, “पूर्व विदर्भाच्या एका नेत्याने दादांना एका फाईलवर सही करण्यासाठी सांगितलं. ती फाईल महत्त्वाची आहे आणि आजच सही करावी असा आग्रह होता. ती फाईल घरी होती आणि मंत्रालयात येण्यासाठी वेळ लागला. दादांचा त्यामध्ये बराच वेळ गेला. तसेच त्यांच्याच पक्षाचा एक बडा नेता दादांना भेटायला येणार होता. पण तो यायला खूपच उशीर झाला. त्यामुळे कारने जाणाऱ्या दादांनी दुसऱ्या दिवशी सकाळी विमानाने जायचं ठरवलं. यामागे काही नियोजन होतं का हे तपासण्याची गरज आहे, असेही रोहित पवार म्हणाले.
















