गुहागर – संजय गांधी निराधार योजनेचे पेन्शन सुरू करून देण्याचे आमिष दाखवून ६८ वर्षीय वयोवृद्ध, अशिक्षित व निराधार विधवा महिलेची जमीन बक्षिसपत्राच्या माध्यमातून स्वतःच्या नावावर करून घेण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या प्रकरणी दिपक धनाजी शिर्के याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून एफआयआर नोंदविण्याची मागणी तक्रारदार महिलेने केली आहे.
तक्रारदार महिलेच्या म्हणण्यानुसार, त्या कायमस्वरूपी रहिवासी असून त्यांचे पती कै. कृष्णा शिरू साळवी यांच्या निधनानंतर त्या एकट्याच राहत आहेत. त्यांच्याकडे कोणतेही नियमित उत्पन्नाचे साधन नसल्याने संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळावा, यासाठी त्या शेजारी व नातेवाईकांकडे चौकशी करीत होत्या. याचदरम्यान त्यांनी ही बाब आपली बहीण सविता शिर्के हिला सांगितली. सविता शिर्के यांनी त्यांचा नातेवाईक दिपक धनाजी शिर्के हा अशा प्रकारची कामे करतो आणि तो मदत करेल, असे सांगितल्याचा तक्रारीत उल्लेख आहे. त्यानंतर दिपक शिर्के तक्रारदार महिलेच्या घरी आला. पेन्शन योजनेसाठी विविध कागदपत्रांची आवश्यकता असल्याचे सांगून त्याने महिलेच्या जमिनीशी संबंधित कागदपत्रांसह इतर कागदपत्रे वारंवार घेतल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. यामध्ये आधारकार्ड देखील त्याने घेतल्याचे महिलेने नमूद केले आहे.
पेन्शन सुरू न झाल्याने महिला दिपक शिर्के याच्याकडे वारंवार विचारणा करीत होत्या. त्यावेळी रत्नागिरीच्या कार्यालयात जावे लागेल, असे तो सांगत असल्याचे तक्रारीत नमूद आहे. दि. ४ ऑगस्ट २०२६ रोजी दिपक शिर्के तक्रारदार महिलेच्या घरी आला. पेन्शनसाठी डॉक्टरांचे प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे सांगून त्यांना आबलोली येथील एका डॉक्टरांकडे नेण्यात आले. त्यानंतर गुहागर येथे आणण्यात आले. यावेळी दिपक शिर्के याची पत्नी प्राजक्ता दिपक शिर्के, मुलगी गार्गी दिपक शिर्के तसेच त्याचा लहान मुलगा सोबत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
गुहागर येथील एका लॉजमध्ये मुक्काम करण्यात आला. आपण येथे का थांबलो आहोत, अशी विचारणा केली असता, ‘तुला पेन्शन पाहिजे ना, म्हणून आम्ही सगळी धडपड करीत आहोत,’ असे सांगण्यात आल्याचा दावा महिलेने केला आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी लाल रंगाच्या कारमधून महिलेला रत्नागिरी येथे नेण्यात आले. प्रवासादरम्यान ‘साहेबांनी काही विचारले तर फक्त हो म्हणायचे, बाकी काही बोलायचे नाही,’ असे वारंवार सांगण्यात आल्याचा गंभीर आरोप तक्रारीत आहे. रत्नागिरीतील एका कार्यालयात नेल्यानंतर काही कागदपत्रांवर महिलेचे वारंवार अंगठे घेण्यात आले. आपण पूर्णपणे अशिक्षित असल्याने तसेच दिपक शिर्के याने विश्वास संपादन केल्यामुळे पेन्शन मिळेल, या आशेने आपण कागदपत्रांवर अंगठे दिल्याचे तक्रारदार महिलेने म्हटले आहे. त्यानंतर एका कार्यालयात त्यांचा फोटोही घेण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.
रात्री सुमारे नऊ वाजता त्यांना त्यांच्या घरी सोडण्यात आले. त्यावेळी ‘पेन्शन सुरू होईल ना?’ अशी विचारणा केली असता, दिपक शिर्के याने ‘हो, नक्की होईल,’ असे सांगितल्याचे तक्रारीत नमूद आहे. दरम्यान, महिलेचा भाऊ अनंत श्रीधर पवार याला या प्रकाराबाबत संशय आला. त्याने माहिती घेतली असता तलाठी, चिखली यांच्याकडून प्रलंबित फेरफार नोंद क्रमांक १८०४ असल्याची माहिती मिळाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या फेरफार नोंदीमध्ये चिखली येथील सर्व्हे/गट नं. १६३२ मधील जमीन दिपक धनाजी शिर्के याला बक्षिस दिल्याबाबत नोंद असल्याचे समोर आल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच बक्षिसपत्र दस्त क्रमांक ५३३२, दिनांक ०५/०८/२०२६ असा उल्लेख तक्रारीत करण्यात आला आहे.
ही माहिती समजल्यानंतर वयोवृद्ध महिलेच्या पायाखालची जमीनच सरकल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पेन्शन मिळवून देण्याच्या नावाखाली आपल्याकडून कागदपत्रांवर अंगठे घेऊन जमिनीचे बक्षिसपत्र करून घेण्यात आल्याचा आरोप महिलेने केला आहे. आपण वयोवृद्ध व अशिक्षित असल्याचा गैरफायदा घेऊन पेन्शन मिळवून देण्याचे आमिष दाखविण्यात आले. पेन्शन योजनेच्या कागदपत्रांच्या नावाखाली अंगठे घेऊन बेकायदेशीर बक्षिसपत्र तयार करण्यात आले आणि त्या आधारे जमिनीवर हक्क निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
या प्रकारात अन्य काही व्यक्ती तसेच दिपक शिर्के यांच्या कुटुंबातील सदस्यांनी मदत केली असण्याची शक्यताही तक्रारीत व्यक्त करण्यात आली आहे.
















