राजकीय पटलावरील चमकता लोकप्रतिनिधी, विंचू दंशावरील लस शोधून काढणारा पहिले संशोधक, समाजातील अंधश्रध्दा, समज-गैरसमज दूर करण्यासाठी झटणारे व ग्रामीण भागाच्या शिक्षण क्षेत्रात अखंड तेवणारा नंदादीप अशा कितीतरी समोजोपयोगी कार्यात आपले आयुष्य सार्थकी लावलेल्या स्वर्गीय डाँ. तात्यासाहेब नातू (सर्वांचे लाडके तात्या) यांचा आज 25 जुलै हा स्मृतीदिन. तात्यांचा या पवित्र स्मृती आजही श्रावणात रिमझिम बरसणाऱ्या दयाघनासारख्या बरसत राहणार आहेत. त्यांच्या स्मृतीदिनी आठवणींना दिलेला हा छोटासा उजाळा…
रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील माखजन या गावी १४ सप्टेंबर १९२९ रोजी श्रीधर दत्तात्रय नातू यांचा जन्म झाला. जन्मभूमी त्यांची माखजन असली तरी त्यांच्या कार्यभूमी ही चिपळूण तालुक्यातील मार्गताम्हाने गाव ठरली. श्री पद्मावती देवीच्या पावन भूमीत अनेक रत्ने जन्माला या गावात आलेली असली तरी याच पद्मावती देवीने या भूमीत असे एक रत्न येथे आणून ठेवले ते आजही देवघरातील नंदादीपासारखे तळपत राहिले आहे. मॅट्रिक नंतर मुंबईच्या पोद्दार इन्स्टिट्यूट मधून वैद्यक शास्त्रातील शिक्षण घेऊन १९५२ साली तात्यासाहेब डॉक्टर झाले. यानंतर वैद्यकीय सेवेसाठी चिपळूण-गुहागर तालुक्यासारख्या ग्रामीण भागात आले आणि मार्गताम्हाने येथे कायमस्वरुपी वास्तव्यास राहिले ते आजतागायत. मार्गताम्हाने त्यांच्या राजकीय, सामाजिक व वैद्यकीय सेवेची खरी कर्मभूमी ठरली. लोकांचे प्रेम, गरीबांविषयीची तळमळ, प्रसंगाला धावून जाणे, वैद्यकीय सेवेसाठी खेडोपाड्यात जाऊन लोकांवर उपचार करणे आदी समाजोपयोगी वृत्तीमुळे श्रीधर दत्तात्रय नातू हे सर्वसामान्यांचे तात्या झाले. वैद्यकीय सेवेबरोबरच तात्यांचा राजकीय प्रवास त्यांच्या अखेरीपर्यंत सार्थकी ठरला. 1940 पासून जनसंघ व नंतर भाजप अशा पक्षीय माध्यमातून तात्यांचे राजकीय कार्य उजळून आले. एक-दोन पराभव वगळता तात्या नेहमी गुहागर विधानसभा मतदारसंघातून निवडून यायचे. सलग चारवेळा ते गुहागरचे आमदार होते. मात्र, त्यांनी विरोधकांचा राजकीय द्वेष कधीच केला नाही. सर्वांनाच सामाजिक प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी तसे प्रयत्नही केले. राजकीय वारसा लाभलेल्या तात्यांच्या कौलारु माडीच्या घरात भाजपच्या नेत्यांची उठबस असायची. प्रमोद महाजन, नितीन गडकरी असे कितीतरी नेत्यांना तात्यांनी आपलेसे केले होते. तसेच नव्यांना त्यांनी घडविलेही. तात्यांनी मतदारसंघातील सर्वांगीण विकासासाठी कधीच राजकारण न आणता इतरांनाही त्यांनी आपल्यात सामावून घेतले. राजकारणाबरोबरच तात्यांना फळलागवड, वृक्षलागवड यांची अतोनात आवड होती. शेती करणे, गायी-गुरे राखणे यामध्ये त्यांचा हातखंडाच होता. सत्ता, पैसा, पदवी सर्वकाही असूनसुध्दा तात्यांनी समाजसेवेची कास कधीच सोडली नाही. गायी-गुरे राखण्यात व शेती करण्यात त्यांनी अखंड आयुष्य घालविले. डोक्यावर घोंगडी, हातात काठी घेऊन रानावनात गुरे राखणारा हा तपस्वी आजही डोळ्यासमोर उभा राहतो.
समाजातील शिक्षणाविषयीची तळमळ तात्यांनी अंगिकारली होती. त्यांनी ग्रामीण भागात शाळा सुरु केल्या. गरीब मुलांनी शिक्षण घ्यावे यासाठी त्यांनी वसतीगृहे काढली. चिपळूण परशुराम एज्युकेशन संस्थेचे २७ वर्षे ते अध्यक्ष होते. विंचू दंशाने त्या काळी अनेक लोक दगावत असत. त्यावर उपाय म्हणून तात्यांनी ब्राझील देशाचा दौरा करून विंचू दंशावरील लस शोधून काढण्यासाठी संशोधन केले आणि हे औषध शोधून काढले. आजही विंचू दंशाने हजारो लोकांचे प्राण तात्यांनी शोधलेल्या लसीमुळे वाचत आहेत. साधी राहणी, उच्च विचारसरणी, गरीबांविषयी असणारी तळमळ, माणुसकीचा अखंड वाहणारा झरा ही तात्यांची नानाविध स्वभाव वैशिष्टये आजही सर्वसामान्यांच्या मनाला उभारी देत आहेत आणि यापुढे देत राहणार आहेत. साध्या कौलारू घरांची माडी त्यांच्या आठवणींची आजही साक्ष देणारी ठरली आहे. पुढील पिढीही याच वास्तूत आज नांदताना दिसत आहे हेच तात्यांचे व त्यांना जनतेने दिलेल्या प्रेमाचे खरे वैभव.
तात्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन!!
-प्रशांत चव्हाण, मार्गताम्हाने