चिपळूण – रत्नागिरी जिल्ह्यासह संपूर्ण चिपळूण तालुक्यात कोरोना रुग्ण वाढत असतानाच अनेक खाजगी बसेस पूर्ण क्षमतेने पुण्यातून प्रवाशांना घेऊन येत असून निव्वळ फायद्यासाठी शासनाच्या नियमांना पायदळी तुडवण्यात येत असल्याने या बस चालकांवर तसेच अशाप्रकारे येणाऱ्या वडाप चालकांवर कठोर कारवाईची मागणी विरेश्वर कॉलनी व परिसरातील नागरिकांनी केली आहे.
माजी आमदार रमेशभाई कदम यांच्यासह ऍड. नितीन केळकर, विश्वास देवधर, संजय चितळे, विजय चितळे, सौ. मंजुषा चितळे, अभय चितळे, प्रकाश दीक्षित, महेश दीक्षित, सौ. धनश्री दीक्षित आदी अनेक नागरिकांच्या सह्या असलेल्या या निवेदनामध्ये, ‘आम्ही विरेश्वर कॉलनी व त्या परिसरातील रहिवासी असून स्वागत हॉटेल ते आपला बाजार असा जो रोड आहे त्या रोडवर अनेक खाजगी बसेस चिपळुण ते पुणे व पुणे ते चिपळूण असे वडाप व्यवसाय करीत होते. महाराष्ट्रात लॉकडाऊन झाल्यानंतर सदर व्यवसाय बंद होता परंतु गेले दोन दिवस पुण्यावरून पुन्हा वडापच्या गाड्या संपूर्ण गाडी भरून प्रवासी घेऊन येत असल्याचे समजल्यावरुन आज दिनांक 25 रोजी सकाळी सुमारे पाच वाजता एक बस तिचा नंबर Mh12 kq166 ही गाडी संपूर्ण प्रवाशांनी भरलेली होती व ती गाडी पुण्याहून आलेली होती. सध्या पुणे व चिपळूणमध्ये देखील covid-19 कोरोनाचा प्रादुर्भाव पहाता बस मध्ये कोणतेही सोशल डिस्टंसिंगचे नियम न पाळता पूर्ण प्रवाशांनी भरलेली बस आमचे येथे आली व सर्व प्रवासी उतरले. सदरचे प्रवासी हे पुणे येथून आलेले असून त्यांची कोणतीही वैद्यकीय तपासणी न होता ते आलेले आहेत व गणपती सणासाठी वरील वडाप चालवणाऱ्या बस ने बुकिंगही सुरू केलेले आहे. वर नमूद केलेली बस आज पूर्ण प्रवासी भरून पुणे पासून चिपळूण पर्यंत कोणतीही तपासणी न करता कशी आली ही गोष्ट अनाकलनीय आहे अशा प्रकारे दररोज पुण्यावरून गाड्या भरून प्रवासी आमच्या येथे उतरले तर आम्हा सर्व नागरिकांच्या जिवाला धोका उत्पन्न होण्याची दाट शक्यता आहे. सदर येणाऱ्या वडापच्या गाड्यातून येणाऱ्या प्रवाशांची कोणती तपासणी न करता बिनधास्तपणे पहाटेच्या सुमारास आम्ही राहतो त्या ठिकाणी त्यांना उतरत आहेत तरी अशा परिस्थितीत या लोकांमुळे येथील रहिवाशांच्या जीवितास काही धोका निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी कोणावर राहील? तरी उद्यापासून रात्री दहानंतर ते सकाळी 7 वाजेपर्यंत स्वागत हॉटेल व हायवे हॉटेल या ठिकाणी बॅरिकेट्स लावून एक सुरक्षारक्षक ठेवून सदर चा रस्ता वर म्हटलेल्या कालावधीकरिता बंद करण्यात यावा आणि तसे न झाल्यास नाईलाजास्तव आम्हाला कारवाई करण्यासाठी आंदोलन करण्या करता मार्ग निवडावे लागतील असे नमूद करण्यात आले आहे.
सध्या कोरोना प्रचंड वेगाने पसरत असून रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. पुण्यासारख्या शहरात तर जगणे मुश्किल झाले आहे असे असूनही तसेच ठीक ठिकाणी तपासणी नाके असतानाही पुण्याहून इथपर्यंत प्रवाशांनी खचाखच भरलेली बस येतेच कशी असा प्रश्न निर्माण झाला आहे.