रत्नागिरी – अनेक दिवस चर्चेत असलेली मडगाव-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस ही सेवा आता २६ जून सुरू होणार आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी या दिवशी पाच एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवतील. यासाठी नरेंद्र मोदी भोपाळमध्ये उपस्थित राहणार आहेत.
कोकण रेल्वे मार्गावरील वंदे भारत एक्स्प्रेसच्या प्रवासाचा मुहूर्त ठरला आहे. मडगाव-मुंबई सीएसएमटी वंदे भारत २६ जून पासून सुरु होईल. या गाडीला रत्नागिरी जिल्ह्यात रत्नागिरी व खेड येथे थांबा देण्यात आला आहे.
ही गाडी मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून सकाळी ५.३५ वाजता सुटेल. ठाणे ६.०५, पनवेल ६.४०, खेड ८.४०, रत्नागिरी १०.००, मडगाव दुपारी १.२५ अशा तिच्या वेळा असतील. मडगाव येथून वंदे भारत एक्सप्रेस दुपारी २.३५ वाजता सुटेल. परतीच्या प्रवासात रत्नागिरीतील तिची वेळ ५.३५ आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनसला ही गाडी रात्री १०.३५ वाजता पोहोचेल.
भारतीय रेल्वे विभागाकडून पाच मार्गांवर वंदे भारत सेवा सुरु करण्यात येणार आहे. ५ वंदे भारत एक्स्प्रेस एकाच दिवशी सुरु करण्यात येणार आहे. २६ जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी भोपाळमध्ये उपस्थित राहणार आहेत. भोपाळमधून दोन वंदे भारत एक्स्प्रेस सुरु होणार आहेत. इतर तीन ठिकाणांहून सुरु होणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसचं नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्घाटन करणार आहेत. मुंबई-मडगाव, बंगळुरु-हुबळी, पाटणा-रांची, भोपाळा-इंदोर, भोपाळ जबलपूर या पाच वंदे भारत एक्स्प्रेसचं उद्घाटन होणार आहे. या पाचही वंदे भारत एक्स्प्रेसला ८ कोच असणार आहेत. यातून एकावेळी ५३० प्रवासी प्रवास करु शकतात.
मुंबई मडगाव वंदे भारत एक्स्प्रेस ही आठवड्यातून सहा दिवस धावणार आहे. ही सेवा शुक्रवारी बंद असेल. तर, मान्सूनच्या काळात ही एक्स्प्रेस तीन दिवस सुरु असेल. या मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून वंदे भारत एक्स्प्रेस सुटेल, दादर, ठाणे, पनवेल, रोहा, खेड, रत्नागिरी, कणकणवली, थिविम या स्थानकांवर थांबेल. मडगाव हा वंदे भारत एक्स्प्रेसचा अखेरचा थांबा आहे.