मुंबई – शिंदे गटात सहभागी होण्यासाठी भास्कर जाधवांनी एकनाथ शिंदेंना जवळपास १०० फोन केले होते, असा दावा भाजपा नेते मोहित कंबोज यांनी केला होता. कंबोज यांच्या या दावानंतर भास्कर जाधवांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
माझ्यावर केलेले आरोप कंबोज यांनी सिद्ध केल्यास मी राजकीय जीवनातून मुक्त होईल, असे ते म्हणाले. विधिमंडळाबाहेर माध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.
“मोहित कंबोज हा फडतूस माणूस आहे. त्याने माझ्यावर केलेला एकतरी आरोप सिद्ध करून दाखवावा. भाजपाकडे भरमसाठ पैसा आहे. तपास यंत्रणा आहेत आणि सत्तेची मस्तीही आहे. मात्र, मी एक सामान्य माणूस आहे. मी तत्वाकरिता लढतो. तुमच्याकडे असलेल्या तपास यंत्रणा माझ्या मागे लावा, १०० सोडा, जर मी एकनाथ शिंदेंना पाच फोन जरी केले असतील, तर राजकीय जीवनातून मुक्त होईन”, अशी प्रतिक्रिया भास्कर जाधव यांनी दिली.
“मोहित कंबोजचा बोलवता अनाजीपंत आहे, त्या अनाजीपंतांनाही मी सांगतो, तुम्ही या महाराष्ट्राची संस्कृती संपवायला निघाला आहात. पण माझ्यासारखे १०० भास्कर जाधव उभे राहतील. माझ्यावर खोटे आरोप करून तुम्ही माझी कारकीर्द संपवू शकत नाही. कंबोजसारख्या फडतूस माणसाने आरोप केल्यानंतर माझी नाही, तर अनाजीपंतांची प्रतिमा डागाळली जात आहे”, असेही ते म्हणाले.