चिपळूण – चिपळूण तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्वाची समजली जाणाऱ्या मिरजोळी ग्रामपंचायत सरपंच कासम दलवाई यांच्या विरोधात सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला होता. याबाबत निर्णय घेण्यासाठी मंगळवार दि.२१ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंग यांचेकडील आदेशानुसार विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. या विशेष सभेनंतर झालेल्या मतदान प्रक्रियेत अविश्वास ठरावाच्या बाजुने ७ मते पडली. त्यामुळे सरपंच दलवाई यांच्या विरोधात अविश्वास ठराव मंजुर झाल्याने सरपंच पदावरून पायउतार होण्याची नामुष्की त्यांच्यावर ओढवली आहे.
सरपंच कासम दलवाई यांच्या विरोधात ग्रामपंचायत सदस्यांनी दाखल केलेल्या अविश्वास ठरावानंतर सदस्यासह सरपंचाचे मतदान घेण्यात आले. ग्रामपंचायतीमध्ये एकूण ९ सदस्य आहे. मात्र, मतदान प्रक्रियेच्यावेळी ९ पैकी १ सदस्य गैरहजर होते. त्यामुळे अविश्वास ठरावाच्या बाजूने प्रत्यक्ष मतदानांच्यावेळी ७ मते पडली तर सरपंच कासम दलवाई यांना स्वत:चे एक मत पडले. त्यामुळे सदस्यांनी ठरावाच्या बाजूने मतदान केल्याने हा ठराव मंजूर झाला. याबाबत सविस्तर अहवाल जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविण्यात येणार आहे.
चिपळूण शहरालगतच असलेली मिरजोळी ग्रामपंचायत महसूलासाठी सक्षम समजली जाते. मिरजोळी ग्रामपंचायत अंतर्गत शैक्षणिक संस्था, हॉस्पिटल व बिल्डींग अपार्टमेंट आहेत. त्यामुळे राजकीय दृष्टीकोनातून मिरजोळी ग्रा.पं.ला महत्व आहे. या ग्रामपंचायतीवर कॉग्रेसचे माजी खासदार हुसेन दलवाई यांचे नेहमीच वर्चस्व राहिले होते. मागील काही महिन्यांपासून ग्रामपंचायत मिरजोळीचे सरपंच कासम दलवाई यांच्या विरोधात सदस्यांमध्ये नाराजीचे सुर होते. याच नाराजीचे शेवटी अविश्वास ठरावात रूपांतर झाले. त्यानुसार मंगळवार दि. २१ फेब्रुवारी रोजी तहसीलदार तानाजी शेजाळ यांच्या अध्यक्षतेखाली विशेष ग्रामसभा बोलण्यात आली. या सभेला ९ पैकी ७ सदस्यांसह सरपंच उपस्थित होते. यावेळी अविश्वास ठरावाच्या नोटीसीमध्ये नमुद मुद्दावर सर्वांचे मते जाणून घेण्यात आली. सरपंच यांनीही आपली बाजू मांडली. त्यानंतर अविश्वास ठरावावर मतदान घेण्यात आले. यावेळी ७ सदस्यांनी ठरावाच्या बाजुने मतदान केले. ३ चतुर्थांश पेक्षा अधिक मत असल्याने सदस्यांचा अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला. या मंजूर झालेल्या अविश्वास ठरावामुळे सरपंच कासम दलवाई यांना सरपंच पदावरून पायउतार व्हावे लागले. आता मिरजोळी ग्रामपंचायतीमध्ये मोठी उलथापालथ होणार आहे. गावच्या विकासासाठी सरपंचपदी आता कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.