चिपळूण -,कोकण रेल्वेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांनी कंटेनर रेल्वेगाडीला हिरवा झेंडा दाखवला. रत्नागिरी ते जे एन पी टी दरम्यान हि कंटेनर रेल्वेगाडी धावणार असून उद्योजकांना आपले उत्पादन निर्यात करणे अधिक सोयीस्कर होणार आहे.
आज सायंकाळी 5:15 वाजता रत्नागिरी रेल्वेस्थानकातून पहिली कंटेनर रेल्वेगाडी धावली. यावेळी कोकण रेल्वेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता,संचालक संतोषकुमार झा, मुख्य वाणिज्य व्यवस्थापक एल.के.वर्मा, क्षेत्रीय प्रबंधक रवींद्र कांबळे, गद्रे मरीन एक्सपोर्टचे संचालक दीपक गद्रे, संचालिका मीना गद्रे उपस्थित होते. रत्नागिरी ते जेएनपीटी दरम्यान ही कंटेनर ट्रेन धावणार आहे. आज पहिल्या दिवशी 12 कंटेनरमधून 250 मेट्रिक टन माल घेऊन ही गाडी धावली. कृषी उत्पादने, मत्स्य उत्पादन आणि आंबा उत्पादकांसाठी निर्यातीकरिता माल पाठवणे सोयीचे होणार आहे. आज पहिल्या कंटेनर गाडीतून गद्रे मरीनच्या उत्पादनाची वाहतूक करण्यात आली.गद्रे मरीनचे संचालक दीपक गद्रे म्हणाले की, 1994 साली रस्ते मार्गाने कंटेनर वाहतुकीसाठी मी प्रयत्न केले होते. रस्ते चांगले नाहीत या कारणाने रत्नागिरीत कंटेनर वाहतूक होत नव्हती. तेव्हा मी लिहून दिले की, रस्त्यामुळे कंटेनरचे नुकसान झाले, तर त्याची जबाबदारी मी घेईन. त्यानंतर 44 कंटेनर रत्नागिरीत आले होते. आज पुन्हा एकदा रेल्वेमार्गाने कंटेनर वाहतूक होणार असल्याने आम्हा उद्योजकांना त्याचा फायदा होणार आहे. माझे आणि कोकण रेल्वेचे नाते जुने आहे. 1991 ला कोकण रेल्वेचे काम सुरू झाले तेव्हा माझ्या पेट्रोलपंपातून डिझेल पुरवठा केला जात होता, अशी आठवण गद्रे यांनी सांगितले.वर्षभरात कोल्ड स्टोअरेज उभारणार कोकण रेल्वेचे संचालक संतोषकुमार झा म्हणाले की, आमचे व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांच्या म्हणण्यानुसार, सर्व कंटेनर वाहतूक रस्त्याने होते.
आपल्या रेल्वेमार्गाने कंटेनर वाहतूक का होत नाही. आपण प्रयत्न करायला हवेत आणि त्यानंतर आम्ही प्रयत्न सुरू केल्यावर आज कोकण रेल्वेमार्गावरून कंटेनर रेल्वेगाडी सुरू होत आहे. या गाडीत वातानुकूलित आणि साध्या कंटेनरचाही समावेश असेल. वातानुकुलित कंटेनरमध्ये ऋण 18 अंश सेल्सियस तापमान ठेवले जाणार आहे. वर्षभरात आपण रत्नागिरीत कोल्ड स्टोअरेजही उभारणार आहोत.