वाई – (प्रवीण गाडे ) – सातारा जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने 17 ते 26 जुलैपर्यंत लॉकडाऊन जाहीर केला आहे. आजपासून हा कडक लॉकडाऊन सुरू होत आहे. दरम्यान, जिल्ह्यात जमावबंदी कलम लागू करण्यात आले असून आदेशाचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिला आहे. जिल्हावासीयांनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा प्रभाव वाढत असल्याने जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दोन टप्प्यांत लॉकडाऊन जाहीर केला आहे. 17 जुलै ते 21 जुलैपर्यंत दूध, औषध दुकाने, अत्यावश्यक सेवा आणि वृत्तपत्रे वगळता जिल्ह्यात कडक लॉकडाऊन होणार आहे. 22 जुलै ते 26 जुलैपर्यंत किराणा, भाजीपाला आदि आवश्यक सेवांना अटी शर्तीवर मुभा देत लॉकडाऊन शिथिल केला आहे.