चिपळूण – काही वर्षांपूर्वी संपूर्ण राज्यभरात गाजलेल्या चिपळूण मधील ‘माऊली’ प्रकरणाचा नुकताच निकाल लागला असून सबळ पुराव्या अभावी न्यायालयाने या प्रकरणातील प्रमुख संशयित वासंती कांबळी व अन्य पाच जणांची निर्दोष मुक्तता केली आहे.
चिपळूण तालुक्यातील कापसाळ फणसवाडी हे वासंती कांबळी ह्यांचे सासर. घरची परिस्थिती हलाकीची असल्याने त्यांनी बरीच वर्षे लोकाच्या घरी धुणी भांडी केली. यादरम्यान त्या बेळगाव निवासी कलावती आई यांची नित्यनियमाने आराधना करू लागल्या. मंदिरात जाणे शक्य नसल्याने त्यांनी घरीच कलावती आईची साधना करण्यास सुरुवात केली. हळूहळू आजूबाजूची लोक सुद्धा त्यांच्या घरी येऊन भक्तिमार्गात लीन झाले. काही दिवसांतच वासंती कांबळी ह्यांची ख्याती सर्वदूर पोहोचली आणि त्यांच्याकडे येणाऱ्या भक्तगणांची संख्या दिवसेंदिवस वाढतच गेली. यानंतर त्यांनी फणसवाडी येथेच श्रीहरी मंदिर बांधले. याठिकाणी दररोज कलावती आईंची पूजा-अर्चा होऊ लागली. भक्तगणांनी वासंती कांबळी यांना ‘माऊली’ची उपाधी दिली गेली.दरम्यान, माऊली वासंती कांबळी यांच्या ‘हरी मंदिरा’त गावागावातील लोक येऊन सेवा करू लागली. कामथे गावातील भक्तसुध्दा येथे येत असत. यातीलच हुमणेवाडी येथे राहणाऱ्या प्रकाश बाईत याने आपला सात वर्षांचा मुलगा प्रथम याचे अपहरण झाल्याची तकार सन २०१५ मध्ये चिपळूण पोलीस ठाण्यात केली. प्रकाश हा हरी मंदिरातील सेवेकरी होता. त्याने केलेल्या तक्रारीमुळे संपूर्ण जिल्हयात एकच खळबळ उडाली. आपल्या मुलाच्या अपहरणामागे वासंती कांबळी यांचा हात असल्याचा जबाब त्याने पोलिसांना दिला होता. या तक्रारीमुळे वासंती कांबळी व त्यांच्या परिवाराला मोठा धक्का बसला होता.”पोलिसांकडून अटक आणि सुटका.प्रकाश बाईत याने तक्रार दाखल करताच चिपळूण पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. तत्कालीन पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर यांनी वासंती कांबळी यांना चौकशीसाठी ताब्यात घेऊन अटक केली. जादूटोणा विरोधी कायद्याखाली त्यांच्यावर कारवाई सुरू झाली. तर याप्रकरणी एकूण सहा जणांविरोधात गुन्हा दाखल झाला. आठवड्याभरात संशयिताची जामिनावर सुटका झाली आणि या प्रकरणाची चिपळूण न्यायालयात सुनावणी सुरू झाली.माझा कोणावरही राग नाही. निकालानंतर वासंती कांबळी यांना गहिवरून आले. हा सत्याचा विजय आहे. मी कधीच चुकीचे कर्म केले नाही. उलट कायमच लोकांची मनोभावे सेवा केली. परंतु हाताची सगळीच बोट सारखी नसतात हेच खरं. पण जाउदे.. मला आता मागे वळून बघायचे नाही. माझा न्यायदेवतेवर पूर्ण विश्वास होता. हा निकाल माझे मनोबल उंचावणार आहे. गेल्या सात वर्षात आम्ही भरपूर भोगले, सहन केले. पण आपला कोणावरही राग नाही. जे आपल्या विरोधात गेले देव त्यांना सुबुद्धी देवो, अशी प्रतिक्रिया वासंती कांबळी यांनी निकालानंतर दिली.