शृंगारतळी – ग्रामीण भागातील महिला सक्षमीकरण, कृषी विकास आणि स्वयंरोजगाराला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने बँक ऑफ इंडिया, शृंगारतळी शाखेतर्फे कृषी दिनानिमित्त ग्रामपंचायत खामशेत येथे स्वयं-सहाय्यता बचत गट (SHG) मेळाव्याचे उत्साहात आयोजन करण्यात आले. या मेळाव्यात विविध योजनांअंतर्गत एकूण ₹९४.६० लाखांचे आर्थिक सहाय्य वितरित करण्यात आले. त्यामुळे अनेक बचत गट, शेतकरी आणि उद्योजकांना आर्थिक बळ मिळाले.
विभागीय व्यवस्थापक नरेंद्र देवरे आणि उपविभागीय व्यवस्थापक अंजनी कुमार सिंह आझाद यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमाला बँक ऑफ इंडियाचे महाव्यवस्थापक शिबा प्रसाद बिश्वाल यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच रत्नागिरी झोनल कार्यालयाचे कृषी विभाग प्रमुख संकेत सकपाळ आणि एसकेव्हीके, चिपळूणचे प्रभारी अमित सावंत हे प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित होते.
या मेळाव्यात २२ स्वयं-सहाय्यता बचत गटांना ₹५७ लाखांच्या कर्ज मंजुरीपत्रांचे वितरण करण्यात आले. याशिवाय ₹७.६० लाखांचे किसान वाहन कर्ज आणि पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग (PMFME) योजनेअंतर्गत काजू प्रक्रिया उद्योगासाठी ₹३० लाखांचे कर्ज मंजूर करण्यात आले. या माध्यमातून ग्रामीण भागातील उद्योग, शेतीपूरक व्यवसाय आणि महिलांच्या आर्थिक स्वावलंबनाला मोठी चालना मिळणार आहे. यावेळी मार्गदर्शन करताना महाव्यवस्थापक शिबा प्रसाद बिश्वाल यांनी आर्थिक समावेशन, सामाजिक सुरक्षा योजनांचे महत्त्व आणि ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम करण्यात बँकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगितले. प्रत्येक पात्र नागरिकाने बँकांच्या विविध योजनांचा लाभ घेऊन आर्थिक प्रगती साधावी, असे आवाहन त्यांनी केले. तर एसकेव्हीके, चिपळूणचे प्रभारी अमित सावंत यांनी शेती, पशुपालन, प्रक्रिया उद्योग आणि इतर पूरक व्यवसायांसाठी उपलब्ध असलेल्या विविध शासकीय योजनांची सविस्तर माहिती देत शेतकरी व बचत गटांनी या योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
उपविभागीय व्यवस्थापक अंजनी कुमार सिंह आझाद यांनी बँक ऑफ इंडिया ही ग्राहकाभिमुख सेवा देणारी बँक असून ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकापर्यंत दर्जेदार आणि अखंड बँकिंग सुविधा पोहोचविण्यासाठी बँक कायम कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाखा प्रमुख संदीप ढवळे, अधिकारी गौरव गालफाडे, कर्मचारी तुषार तांबे आणि ज्ञानदीप मोरे यांनी विशेष परिश्रम घेतले.या कार्यक्रमास खामशेतचे सरपंच मंगेश सोलकर, माजी उपसरपंच विष्णू पारदळे, रमेश पारदळे, सिद्धी नरळकर, अस्मिता कदम, वर्षा माचीवाले, जान्हवी सोलकर, चंद्रकला नरळकर, विलास वाघे यांच्यासह खामशेत गावातील मोठ्या संख्येने महिला, बचत गटांच्या सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामीण भागातील महिला सक्षमीकरण, शेतीपूरक उद्योगांना आर्थिक बळ आणि शासकीय योजनांचा प्रभावी लाभ देण्याच्या दृष्टीने आयोजित करण्यात आलेला हा मेळावा लाभार्थ्यांसाठी प्रेरणादायी आणि अत्यंत उपयुक्त ठरला.

















