चिपळूण – कृत्रिम महागाई, कृत्रिम बेरोजगारी कमी करण्याबरोबरच सातत्याने शेतकऱ्यांवर अन्याय दूर करण्याबरोबरच हा देश वाचवायचा असेल तर काँग्रेसशिवाय पर्याय नाही. ही भूमिका आता सगळ्याना कळायला लागली आहे. परंतु काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहचले पाहिजे, असे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी चिपळुणातील माटे सभागृहात काँग्रेसच्या रत्नागिरी जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळाव्याप्रसंगी केले.
तसेच या मेळाव्याच्या यशस्वी नियोजनाबद्दल तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे कौतुक केले. यावेळी व्यासपीठावर हुसेन दलवाई, पक्ष निरीक्षक गुलाबराव घोरपडे, जिल्हाध्यक्ष अविनाश लाड, चिपळूण तालुकाध्यक्ष प्रशांत यादव, मंडगणड तालुकाध्यक्ष मुश्ताक मिरकर, खेड तालुकाध्यक्ष गौस खतिब, गुहागर तालुकाध्यक्ष लियाज ठाकूर, आदी उपस्थित होते.
यावेळी नाना पटोले पुढे म्हणाले की, काँग्रेसचे नेते राहुल गांधी कन्याकुमारी ते काश्मिरपर्यंत पदयात्रा करीत आहेत. आपल्या देशाचा तिरंगा वाचला पाहिजे, या देशाचे संविधान वाचले पाहिजे, या देशातील सर्व जाती-धर्माची जी लोक आहेत. त्यांचे बंधुत्व आणि प्रेम कायम राहीले पाहिजे. या भावनेतून कन्याकुमारी ते काश्मिरपर्यंत पदयात्रा करून सगळ्यांना जोडण्याचा संकल्प घेऊन ते निघाले आहेत. तर महाराष्ट्रात ईडीच्या धाकाने महाविकास आघाडी सरकार पडल आणि ईडीचे भाजप प्रणित सरकार महाराष्ट्रात आले आहे.
यावेळी गोवळकोट येथील नईम खाटीक, सागर नरळकर, जिजाऊ ब्रिगेडच्या ॲड. स्मिता कदम यांच्यासह कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते चिपळूण काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.