चिपळूण – चिपळूण –गुहागर मार्गावरील मिरजोळी-साखरवाडी ते उक्ताड दरम्यानची गटारे पुर्णत: बुजली गेली आहेत. त्यामुळे डोंगर भागातून येणारे पावसाचे पाणी थेट रस्त्यावर येऊ लागला आहे.
वर्षभर सार्वजनिक बांधकाम विभागासह राष्ट्रीय महामार्ग उपविभागाने केलेल्या दुर्लक्षामुळे मुसळधार पावसात या ठिकाणी रस्ताच नदी बनू लागला आहे. काही ठिकाणी ढोपरभर खड्डे पडल्याने सातत्याने दुचाकींसह वाहने अडकण्याचे प्रकार घडत आहेत. एवढेच नव्हे तर या परिसरात दुचाकी घसरुन अपघातही घडू लागल्याने संताप व्यक्त केला जात आहे.गेली दोन वर्षे मिरजोळी ते उक्ताड दरम्यानचा रस्ता पावसाळ्यात धोकादायक बनत आहे. गतवर्षी वाहन धारकांसह स्थानिक ग्रामस्थांची ओरड होताच मिरजोळी ग्रामपंचायतीने पुढाकार घेतला. सरपंच कासम दलवाई व त्यांच्या सहकाऱ्यांनी पाठपुरावा करून राष्ट्रीय महामार्ग उपविभागाकडून या परिसरातील रस्त्यावर मोरी टाकली, तर गटार खोदाईचे काम मात्र प्रलंबितच राहिले. वर्ष ओलांडले तरी राष्ट्रीय महामार्ग व सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी या परिसरात कोणतीही ठोस उपाययोजना केलेली नाही. या परिसरातील गटार पुर्णपणे बुजले आहे. डोंगर भागातून पाण्यासोबत आलेले दगड व माती या गटारांत साचली आहे. त्यातच काही बांधकाम व्यावसायिकांनी रस्त्यावरचे पाणी पुढे सरकण्यासाठी जागाच शिल्लक ठेवलेली नाही. त्यामुळे सध्या हा रस्ता कमी, पण नदीच असल्याचा भास होऊ लागला आहे. या परिसरातील काही रस्त्यावर खड्डे पडले असून त्यातून मार्ग काढताना वाहन धारकांची दमछाक होत आहे. शिवाय पावसाचा जोर वाढताच हा मार्ग वाहतुकीसाठी बंद पडत आहे. दिव्यांग बांधवांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यांवर पावसाळ्यापुर्वी मिरजोळी-साखरवाडी ते उक्ताड दरम्यानच्या खड्डेमय रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले आहे. मात्र त्या रस्त्यावरही खड्डे पडू लागल्याने कामाच्या दर्जाबाबत प्रश्न निर्माण झाला आहे. गुहागर मार्गावर कायम वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे या रस्त्यावर येणारे पाणी नागरिकांच्या अंगावर उडत आहे. संबंधित विभागाने या परिसरातील रस्त्यावर योग्य ती उपाययोजना करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.मोरी ढासळण्याची शक्यताचिपळूण-गुहागर मार्गावरील साखरवाडी येथे असणारी मोरी आरत असल्याने तेथील वाहतूक धोकादायक बनली आहे. नव्याने केलेले डांबरीकरणशची त्यामुळे वाट लागली आहे. वाहनधारकांना त्या परिस्थितीचा अंदाज येत नसल्याने छोटे-छोटे अपघात घडू लागले आहेत. शुक्रवारीही एका दुचाकीस्वाराचा अपघात होऊन तो जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. वेळीच या ठिकाणी उपाययोजना केली गेली नाही तर गुहागर रस्त्यावरची वाहतूक ठप्प होण्याची शक्यताही निर्माण झाली आहे.