बातम्या शेअर करा

गुहागर – 25 ऑक्टोबर ला मासेमातीसाठी गेलेली नावेद 2 ही बोट 7 खलाशांसह बेपत्ता आहे. या घटनेमागे नेमकं कारण काय आहे हे जरी गुलदस्त्यात असलं तरी जिंदाल या धनाढ्य कंपनीच्या एका कार्गोच्या धडकेत नावेद 2 या बोटीचा अपघात झाला असावा असा विश्वास इथले स्थानिक मच्छिमार आणि बोट मालक करताय. या घटनेला 15 दिवस उलटले तरी आपली व्यवस्था अजून निवांत आहे….घटना घडल्यानंतर संबंधीत यंत्रणेची ऍक्टिव्हिटी पाहिलीत की लक्षात येईल की गरीबाच्या जीवाला इथे काय किंमत आहे. राजकारण्यांबद्दल तर न बोललेलंच बरं. बोट मालक पोलिसांकडे बोट दाखवतो, पोलीस कोस्टगार्डकडे बोट दाखवतात, कोस्टगार्ड आणखी कोणाकडे हे सगळं ढकला ढकलीचं काम सुरू आहे, पुढेही राहील यात शंका वाटत नाही.

जिंदालच्या कार्गोने नावेद 2 या बोटीला धडक दिली असावी या मच्छिमारांच्या शंकेला वाव आहे त्याची कारणही तेवढीच महत्वाची आहेत…त्यातील महत्वाचं कारण म्हणजे ज्या दिवशी ही बोट बेपत्ता झाली,त्याच दिवशी जिंदाल पोर्ट च्या सिक्युरिटी कडून जयगडच्या स्थानिक मच्छिमारांना तुमच्या पैकी कोणाची बोट बुडाली आहे का असा प्रश्न विचारण्यात आला. शिवाय त्या मार्गावरून जाणाऱ्या मासेमारी बोटींना आत जाऊ नका असंही सांगण्यात आल्याचं तिथले मच्छिमार आणि बोट मालक सांगतायत. दुसरं कारण म्हणजे पोलिसांनी कार्गोच्या कॅप्टनला विचारल्यावर तो म्हणतो की आम्हाला बोट सदृश्य काहीतरी दिसलं. पण ती बोटच होती हे सांगू शकत नाही.कार्गो च्या GPS ट्रॅकवरून पोलिसांनी माहिती घेतली तेव्हा चॅनल च्या एका पॉईंट ला बोट अचानक टर्न घेताना दिसतेय (सागरी वाहतुकीत एखाद्या बोटीला जाण्यासाठी फिक्स असा मॅप असतो त्यातूनच त्या बोटीने जायचं असतं त्याला चॅनल म्हणतात.) आता या कार्गोने अचानक टर्न का घेतला हा संशोधनाचा आणि संशयाचा मुद्दा आहे..ज्या अर्थी त्याने अचानक टर्न घेतला त्याअर्थी आपल्या मार्गात काहीतरी आलंय याची एकतर जाणीव त्या कार्गोच्या कॅप्टनला झाली असावी नाहीतर ठोकर दिल्यानंतर कार्गो बाजूला घेतली असावी असा संशय निर्माण होतो.
आता या सगळ्यावर जिंदाल कंपनीने अद्यापतरी स्पष्टीकरण दिलेलं नाही, कंपनीचा PRO पत्रकारांचे फोनच घेत नाहीये, उत्तरं तर लांब राहील. पण उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या समोर कंपनीने CSR मधून खलाशांच्या वारसांना मदत करण्याच्या बाबतीत सकारात्मकता दाखवलीय. आता हा उदारमतवादीपणा का ? असाही प्रश्न आहेच. जयगड मच्छिमार सोसायटीचे बशीर होडेकर विश्वासाने म्हणतात की नावेद 2 या बोटीला अपघाताच झालाय आणि तो जिंदाल च्या कार्गो मुळेच झालाय. कंपनीने आम्हाला मदतीचे आश्वासन दिलंय म्हणून आम्ही उघड बोलत नाही आहोत,पण कंपनीने मदत केली नाही तर आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. आता बोट मालक म्हणून पाहिलं तर एकही खलाशाचा विमा बोट मालकांनी काढलेला नाही,त्यामुळे या प्रकरणात बोट मालकही जबाबदार आहेत,त्यांच्यावरही कडक कारवाई होऊन भविष्यात खलाशांचा विमा काढण्याच्या संदर्भात कठोर भूमिका घेणं गरजेचं आहे.

ही सगळी घटना पाहिल्यावर वाटतं की साला माणसाच्या जीवाला काही किंमत आहे की नाही ? घटना घडते कधी प्रशासन जागं कधी होतं ? शोधकार्य कधी सुरू होतं ? कशाचा कश्याला पत्ताच नाही. एक स्थानिक सांगत होता की समुद्रात बोट बुडालेली कोणाला खबरच नाही.पोलीस गावात आल्यावर समजलं काहीतरी झालंय म्हणून.

एक मच्छिमार बांधव काल बोलताना ओघाने म्हणाला की एखादा बस अपघात झाला,किंवा कुठे दरड कोसळली, कुठे ट्रेन दुर्घटना घडली तर सरकार त्यातील मृतांना वा दुर्घटना ग्रस्तांना तातडीची मदत म्हणून 2/5लाख सहज जाहीर करतं. मग आम्ही तर सदैव मरणाशी झुंजत असतो, सुईच्या टोकावर मावेल एवढी सुध्दा जागा आमच्या नावे नाही, आमचा संघर्ष समुद्रात सुरू आणि समुद्रातच संपतो.मग,आम्हाला वेगळा न्याय का ??? हे बोलत असताना त्याने व्यवस्थेची अनास्था कशी असते याचाही पाढा वाचला. तो म्हणतो असे आमचे किती खलाशी जीवानिशी गेले हे आमचं आम्हाला माहिती साहेब…..आमच्या जीवाला किंमत नाही वो. आणि हे खरं आहे खरंच गरिबाला कोणी वाली शिल्लक राहिलाय असं अजिबात वाटतं नाही. हल्ली श्रीमंतांच्या पाळीव कुत्र्याला किंमत आहे,पण गरिबाला जीवची किंमत नाही….. आर्यन खान साठी अनोलने उभारणारी अनेक आहेत,पण समुद्राच्या पोटात घुसून तुमच्या ताटात मासळी देणाऱ्या खलाशाच्या चौकशीला आपल्याकडे कोणालाच वेळ नाही ही मोठी शोकांतिका आहे.

इखाद्याच्या घरातला आधार निघून गेला की त्या कुटुंबाची काय वाताहत होते याची कल्पना आपल्या व्यवस्थेने करायला पाहिजे.त्याचं दुःख समजून त्यांना मदत केली पाहिजे, राजकारण्यांनी अश्या घटनांचीतरी तात्काळ दखल घ्यायला पाहिजे. माणुसकी जपली पाहिजे.15 दिवस झालेत यंत्रणेच्या हाती काहीच लागलेलं नाही…..या सगळ्या घटनेचा खरा शोध लावून सर्व खलाशांना न्याय मिळवून देण्यात आपली यंत्रणा यशस्वी होते की पुन्हा पैसा जिंकतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here