फी भरली नाही म्हणून शाळेतून काढून टाकल, फी भरली नाही म्हणून विद्यार्थ्यांचे दाखले पोस्टाने पाठविले, फी भरली नाही म्हणून वकिलातर्फे नोटिस धाडली असे आणि अशाप्रकारे काही शाळा विविधमार्ग अवलंबित आहेत असे सातत्याने वाचनात येते. याला पालकांची शोकांतिका की विद्यार्थ्यांचे दुर्दैव म्हणावे हेच समजत नाही. सर्वांनाच मान्य आहे की शाळांनाही समस्या असतात, त्यांनाही खर्च आहे परंतु या करोना काळात फी साठी काही शाळा जो मनमानी मार्ग निवडताहेत किंवा पालक, विद्यार्थी यांना एक प्रकारे वेठीस धरण्याचा प्रकार वाचनात येतो तो मानवतेला नव्हे शिक्षणा सारख्या पवित्र क्षेत्राला शोभा देणारा नाही असे म्हटल्यास ती अतिशयोक्ति होईल असे नाही.
करोनाच्या काळात पालक आर्थिक, मानसिकरीत्या पार हतबल झालाय, यात शाळांच्या या कृतीने तो व विद्यार्थीही अधिकच तणावाखाली वावरतोय, येतोय. खर म्हणजे शिक्षण थांबविणे हेच मुळात योग्य नाही आणि शाळानीही या काळात कळ सोसायला हवी. शासनाने वेळीच अशा शाळांची दखल घेऊन, त्यांच्याही समस्या जाणून घ्याव्यात परंतु एकाही विद्यार्थ्याचे शिक्षण खंडित होणार नाही आणि पालकांनाही दिलासा मिळेल असा मार्ग काढावा असे वाटते. नाहीतर शाळांच्या या फी हट्टापुढे आधीच आर्थिक, मानसिक हतबल झालेला विध्यार्थी, पालक अधिकच ताण तणावाखाली जात राहील.
विश्वनाथ पंडित