राष्ट्रवादीचे पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी शरद पवार यांच्या नावाने ११०० बेडचे कोविड सेंटर चालू केले आहे. त्यात शंभर बेड ऑक्सीजनचे आहेत. आमदार निलेश लंके यांनी या अकराशे रूग्णांचे पालकत्व स्विकारले आहे. ज्या घरातले प्रमुख कोरोनाने संपले आहेत त्या कुटूंबातल्या लहान मुलांचेही पालकत्व आमदार निलेश लंके यांनी स्विकारले आहे. ते स्वत: कोविड सेंटरमध्ये राहतात, रूग्णांची सेवा करतात. ” माझे काही व्हायचे ते होऊ दे, मी असुरक्षित झालो तरी होवू दे पण लोक जगले पाहिजेत !” ही भूमिका घेवून आमदार निलेश लंके लोकांची सेवा करतायत. लंकेंचे कोविड सेंटर शेकडो गोर-गरिब रूग्णांचे आधारवड झाले आहे. लंके जणू या गोर-गरीबांचा देव झाले आहेत. कोरोनाच्या या भयंकर काळात त्यांनी लोकांना मोठा दिलासा दिला आहे. त्यांच्या या कार्याला हात जोडून सलाम करावा लागेल. त्यांच्याकडे ना कारखाना आहे, ना सुतगिरण पण लोकांच्या पाठबळावर स्वत:चा जीव धोक्यात घालून आमदार निलेश लंके अहोरात्र लोकांच्या सेवेत आहेत. आमदार निलेश लंकेचा आदर्श रत्नागिरी जिल्ह्यातील नेते मंडळी घेतील का ? हा खरा सवाल आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या काही दिवसात कोरोनाचा कहर सुरू आहे. लोकांचे पराकोटीचे हाल सुरू आहेत. गावा-गावात कोरोनाचे रूग्ण सापडतायत. गत मार्चपासून आत्तापर्यंत जिल्ह्यात सुमारे 30 हजाराच्यावर लोक कोरोनाने बाधीत झालेले आहेत. सध्या 9 हजारापेक्षा जास्त बाधीत रूग्ण आहेत. आजवर 900 पेक्षा जास्त लोकांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे तर सध्या 1700 पेक्षा जास्त लोकांची प्रकृती चिंताजनक आहे. ही जिल्ह्याच्या नोडल अधिका-यांनी दिलेली आकडेवारी आहे. वस्तूस्थिती यापेक्षा वेगळी असू शकते. रत्नागिरी जिल्ह्यात अनेक रूग्णांचा ऑक्सीजनअभावी जीव गेला आहे. कित्येक लोक हॉस्पिटलच्या वाटेत आणि दारात तडफडून मेले आहेत. कित्येक घरातली कर्ती माणसं मेली आहेत. अनेकांची घरं उघडी पडली आहेत. कोरोनाने जिल्ह्याचे फार मोठे नुकसान केले आहे. आजही ऑक्सीजन आणि व्हेंटीलेटर बेडसाठी लोक पेशंट गाडीत घालून दारोदार भटकतायत. कुणी बेड देता का बेड ? अशी साद घालत वेगवेगळ्या हॉस्पिटलचे दरवाजे ठोठावतायत पण तरीही त्यांना बेड मिळत नाहीत. आभाळ फाटल्यासारखी स्थिती आहे. या काळात अनेक रूग्णांना ऑक्सीजनसाठी तडफडून मरताना पाहिलय. हे सगळं चित्र पाहून अनेकवेळा रडू आले, अक्षरश: हूंदके देवून रडलो, जीव कासावीस झाला पण करायचं काय ?
या विपरीत काळात रत्नागिरी जिल्ह्यातले नेते मैदानात उतरून जनतेसाठी राबताना दिसले नाहीत. लोकांची सोय करताना दिसले नाहीत. मतांसाठी दारा-दारावर जाणारे, लोकांना दारू पाजणारे, ढाब्यावर नेवून मटन चारणारे, पैसे देवून गुलाम करणारे नेते आपल्या हस्तीदंती मनो-यातून बाहेर पडलेले दिसले नाहीत. लोकांना त्यांच्याच स्थितीवर सोडले आहे. हॉस्पिटलला ऑक्सीजन नव्हता. डॉक्टर मंडळी उपचार करायचे सोडून ऑक्सीजनसाठी भटकत होती. लोक मरत आहेत. या काळात जनतेचे कैवारी कुठे आहेत ? जिल्ह्यात एक मंत्री,पाच आमदार आणि दोन खासदार महाशय आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब, उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत गुहागरचे आमदार भास्कर जाधव, दापोलीचे योगेश कदम ,चिपळूणचे शेखर निकम , राजापूरचे राजन साळवी,. असे असतानाही अख्खा जिल्हा राम भरोसे असल्यासारखी स्थिती आहे. जिल्ह्यात कमालीची ऑक्सीजनची कमतरता होती आणि आजही आहे.
काही अपवाद वगळता इथले . सगळी नेतेमंडळी गलेलठ्ठ आणि गब्बर आहे. जिल्ह्यातील जनता तडफडत असताना, ऑक्सीजनसाठी टाचा घासत असताना, बेडसाठी भटकत असताना यातल्या एकाही बहाद्दरला कोविड सेंटर उभे करायची इच्छा झाली नाही. आमदार निलेश लंके यांच्यासारखे हॉस्पिटल उभा करून गोरगरीबांना आधार द्यायची दानत यातल्या कुणीच दाखवली नाही. सगळे चिडीचुप आप-आपल्या घरात बसलेले आहेत. कुणीच आप-आपली बिळं सोडली नाहीत. फार तर फोन करून आपल्या मागे-पुढे करणारांना, पै-पाहूण्यांना आणि मित्र मंडळींनाच सरकारी किंवा खासगी हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध करून दिले असतील. यापेक्षा फार मोठे काम यातल्या कुणी केलेले ऐकीवात नाही. काहीजण ऑक्सीजन प्लांट उभारणार होते त्याचे काय झाले ? हे ही त्यांनाच ठाऊक. सत्ताधारी काय अन विरोधक काय सगळे सारखेच आहेत. लोकांना या मंडळींनी अक्षरश: वा-यावर सोडलेले दिसते आहे. पालकमंत्र्यांच्या बैठकामधून काय निष्पन्न झाले ? हे ही त्यांनाच ठाऊक.
रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व विद्यमान आमदार व खासदार यांनी मनात आणले तर प्रत्येक तालुक्यात एक मोठे कोविड सेंटर उभे करू शकतात हेही तेवढंच खरं
मात्र रत्नागिरीच्या नेत्यांनी जनतेला गृहीत धरले आहे. लोकं विकत मिळतात त्यांचे काय ? निवडणूका आल्या की दारू, मटन आणि पैसे फेकले की लोक मागे पळत येतील हा या सर्वांनाच विश्वास असावा.
लोकं मेली काय आणि जगली काय ? आपली दुकानदारी चालली म्हणजे बस्स झाले अशीच या सर्वांची मानसिकता दिसते आहे. या सगळ्यांचेच राजकारण कार्पोरेट झाले आहे. ही सगळी सामान्यांची पोर आहेत पण आज त्यांच्याकडे पाहिले की हे सामान्यांचे नेते आहेत असे अजिबात वाटत नाही. त्यांना सामान्य जनतेचे काही पडले आहे असे अजिबातच वाटत नाही. हजारो लोकांची खासगी कोवीड सेंटरमध्ये जावून उपचार घ्यायची औकादच नाही त्यांचे काय ? ज्यांची सर्दी-खोकल्याची लायकी त्यांना कोरोना झाला तर दिड लाख, दोन लाख बिल होते आहे. सर्दी-खोकल्याची लायकी असणारे गोर-गरिब इतके बिल कसे भरणार ? आर्थिक कुवत नसल्यानेही यावेळी अनेकांचा जीव गेला आहे. पण लोकांचे काय, ते मेले तर मरू देत आमचे दुकान मात्र जीवंत राहिले पाहिजे अशीच रत्नागिरीच्या नेत्यांची मानसिकता दिसते आहे. आमदार निलेश लंकेसारखा प्रतिनीधी प्रत्येक मतदारसंघाला भेटावा हिच अपेक्षा.