बातम्या शेअर करा

मी माझं गाव शिक्षणासाठी सोडलं तेव्हा शहरातल्या मुलांना गावाचं नाव पाचांबे सांगायचो तेव्हा ते हसायचे ‘ फक्त पाचच आंबे ‘ असं विचारायचे मी ही ती हसण्यावर घ्यायचो. माझं गाव तसं डोंगराच्या कुशीत वसलेलं. तीन बाजुंनी डोंगर, हिरवेगार घनदाट जंगल,जंगली  पशुपक्ष्यांचे तर माहेरघर, पाण्याने समृद्ध, गावातल्या प्रत्येक वाडीत विहीर, ग्रामदेवता वाघजाईचे मंदीरासह, गावात बौद्ध विहार,  हनुमान मंदीर व दत्त मंदीर हि धार्मिक स्थळं,  गावाच्या पुर्वेचा उंच डोंगर तर पश्चिमेला उंच डोंगराच्या पायथ्याला वसलेलं कोंडभैरव नावाचं छोटसं गाव, उत्तरेला कुटगीरी,  राजीवली,  रातांबी ही गावं आणखी दोन गावं नावाने सारखी वाटायची ती म्हणजे,  ‘ कुचांबे ‘ नी ‘ रातांबी ‘. 

माझ्या पाचांबे गावात काही आंब्याच्या झाडांना पुर्वजांनी नावं ठेवली होती,  उदा. आंब्याचा रंग काळा म्हणुन त्याचं नाव ‘ काळांबा ‘, रंग पांढरा म्हणुन ‘ पांढरांबा ‘, फळ आकाराने लहान म्हणुन ‘ बिटकी ‘,  फळ आकाराने मोठे म्हणुन ‘ ढेरांबा ‘ फळ लांबडे म्हणुन ‘ लांबडोकी’ अशी गमतीदार नावं,  आमची मैफील या आंब्यांखाली जमायची,  ‘ पहिला माझा व्हक्का ‘ म्हटल की ते वाक्य जो पहिल्यांदा बोलेल त्याला पहिला आंबा प्रामाणिकपणे दयायचा हि निरागसता व प्रामाणिकपणा आम्ही त्या झाडांखाली शिकलो. या आंब्यांना प्रचंड गोडी होती,  गंम्मतीने सांगाव तर एवढी गोडी की बाजारातले हापुस,  तोतापुरी इ. आंबे या आमच्या आंब्यांच्या घरात पाणी भरतील.
माझ्या गावात एक नदी आहे गडनदी, या नदीचं पाणी बारमाही वाहणारं घरातल्या फ्रिजपेक्षा थंड नी बिसलेरी पाण्याच्यापेक्षाही स्वच्छ.  गावातल्या बुजुर्ग माणसांनी नदीचे काही डोह ठरवुन दिलेले.जसं विहीरीचा डोह बौद्धवाडीतल्या लोकांसाठी,  काळा डोह मधल्यावाडीतल्या लोकांसाठी,  कोंड गायकवाडवाडीसाठी बाकी सर्व नदी सार्वजनीक मात्र ठरवुन दिलेल्या डोहात वर्षातुन एकदाच मासे पकडायचे मुंबईचे चाकरमनी गावी आले की. हे हारे भरुन पकडायचो एक दोन दोन पायली मासे प्रत्येकाच्या वाटयाला यायचे.  हे  शक्य होतं माझ्या गावात कारण माणसं प्रामाणिक होती.
पाऊस सुरु झाला की आम्ही रात्री रॉकेल च्या बत्तीवर खेकडे, मासे पकडायला जात असु. अगदी सायंकाळी साडेसात वाजता सुरु झालेला कार्यक्रम मध्यरात्री ३.०० वा.पर्यन्त चालायचा. धावत्या पाण्यात खोलवर डुबकी मारुन पागाने मासे पकडण्याची मजा काय औरच होती. एवढी मोठी नदी कधी कुणाच्या जीवावर उठली नाही की तिच्या पोटातल्या विषारी सरपटणा-यांनी कुठल्या माणसाला दंश केला नाहीत,  कदाचित त्या प्रामाणिक माणसांसोबत ती ही प्रामाणिक राहत असतील. नदीवर बांध घालुन तिचा प्रवाह बदलुन  पाणी बाजुने काढुन उपसण्याचं कौशल्य कुठुन घेतलं काय माहीत. पण तुमच्या सिव्हील इंजिनिअर ना तोंडात बोट घालायला लावेल अशी मातीची बांधबदीस्ती आमचे लोक करायचे व मासे पकडायचे. बांधणं धरुन चढनीचे मासे पकडायची कला काही वेगळीच.
ग्रामीण भाग म्हटला की भुताखेतांच्या गोष्टी आल्या त्यात कोकणातली भुता म्हणजे लय डेंजर,  आमच्या मराठी शाळेवरील निवाच्या विस्तिर्ण झाडावर जकीन बसलेली असते असे गावकरी सांगायचे संध्याकाळी ७.०० नंतर तिकडे दुकानावर जायचं म्हटलं किंवा भुरावणेंच्या चक्कीवर जायचं म्हटलं नी नको वाटायचं. पण काहीअपवादात्मक  माणसांना जकीन बहुतेक सांभाळुन घ्यायची ते म्हणजे ‘ दारु पिणारे ‘.हे सगळे सायंकाळी ६.०० वा.जायचे व ७.०० वा.नंतर ‘ हालिंग डुलिंग ‘ करत अगदी त्या शाळेजवळील निवाच्या झाडासमोर ताठ व ठामपणे उभे राहुन जकीन नावाच्या त्या भुताची आई बहिणीची आठवण काढुन उद्धार करायचे,  तेव्हा दुसरं मनात ठसलं गेलं दारु पिवुन आला की भुतं पण त्या माणसाला घाबरतात. ख-या अर्थानं माझ्या मनातली भुताखेतांची भिती घालवली ती माझा मित्र लालु (सत्यजित) ने , हा भाई मला सती (गावचं ठिकाणाचं नाव,  जिथे पुर्वी महिला नव-यासोबत सती जायच्या) वर घेवुन जायचा दोन्ही बाजुला स्मशाण मध्ये नदी,  हा पठ्ठ्या डायरेक्ट जिथे माणसांना  अग्नि देतात तिथे जोत्यावर जावुन बसायचा,  जिथे दुपारी १.वा. गावातली माणसं जायला टरकायची तिथे याची ही कर्तबगारी!  मला तेव्हा तो शक्तिमानच वाटायचा,  कोंडीच्या डोहात उंच बुरुजावरुन उडी मारायचा,  रात्री नदीत लावलेले गळ सकाळी पाच वाजता नदीत काढायला न्यायचा गळाला लागलेले मोठमोठे तडफडणारे मासे आजही डोळ्यासमोर दिसतात.
गावाच ठरावीकच एस.टी.च्या गाडया यायच्या,  अगदी ३.कि.मी.वर तिसंगफाटयावर  धुरळा उडाला की एस.टी.आली हे आम्हाला जाणवायचं.  ‘ एवढा प्रचंड विकास ‘ राजकारण्यांनी केला होता. पावसाळी एवढया मोठया नदीवर  लाकडाचा साकव होता. आजुबाजुला धरायला काहीच नाही. हायबीपीधारक माणसं त्यावरुन बसुन बसुन जायची. नदीपलीकडील शेतीत जायचं तर बैलांना नदी पोहुन ओलंडुन जाण्याशिवाय पर्याय नव्हताच.एस.टी.ला ३ कि.मी.चालत जावे लागे. सकाळी गेलेला माणुस दुपारच्या एस.टी.ने.परत आला नाही की संध्याकाळच्या वस्तिच्या गाडीवर वाडीतले २ – ४ जणं ‘ पुढे जायचे ‘. महावितरणाचा तर आनंदी आनंद होता.
गावाच जातीभेदाला थारा नव्हता,  काळानुसार तो नाहीसा झाला त्याचा अभिमान आहे. गावात दुकान एकच,  श्रीराम सावंतांचे!  नावाप्रमाणे हा माणुस,  गोरगरीबांना सांभाळुण घ्यायचे.
तसा छोटा असल्याने प्रत्येक  लहान थोर एकमेकांना ओळखायचा,  अगदी प्रत्येकाच्या बैलांची व गाईंची नावंही एकमेकांना माहीत एवढी एकमेकाबद्दल आपुलकी.  मुंबईतला चाकरमनी जाणारा असेल तर त्याला सोडायला अख्खी वाडी डोळे भरुन एस.टी.थांब्यावर यायची.
आता माझ्या गावात धरण बांधलंय, वर्षभर प्रचंड पाणीसाठा असतो. त्यात आमचं गाव, आमची घरे पाण्याखालच्या निरव शांततेत स्तब्द्पणे उभी आहेत.

– आशिष प्रकाश बल्लाळ,
  रा.पाचांबे ता.संगमेश्वर 
  जि.रत्नागिरी 
  मो.नं.९९६०३२५१७४


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here